ज्येष्ठ साहित्यिक अर्जुन डांगळे यांचे भोरमध्ये प्रतिपादन
भोर – फुले, शाहू, आंबेडकर या महापुरुषांचे समता बंधुत्वाचे विचार दाबून टाकून देशात धर्मांध शक्ती पुन्हा सक्रीय होत आहेत. आपण बोललो नाही तर प्रस्थापित वर्ग प्रतिक्रांती घडवून आणेल, असे परखड मत ज्येष्ठ साहित्यिक अर्जुन डांगळे यांनी व्यक्त केले.
नवव्या फुले, शाहू, आंबेडकर विचार प्रसार साहित्य संमेलनात आपले अध्यक्षीय भाषणात बोलताना त्यांनी हे विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कोकणी जेष्ठ साहित्यिक दामोदर मावजो, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलसचिव डाँ. विजय खरे, संमेलनाचे स्वागताध्यक्ष आमदार संग्राम थोपटे, अभिनेते आणि विचारवंत किरण माने, नेस वाडिया महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वृषाली रणधीर, अनंतराव थोपटे महाविद्यालयाचे प्राचार्य प्रसन्नकुमार देशमुख, डॉ. सुरेश गोरेगावकर , कॉ. ज्ञानोबा घोणे, साहित्य परिषदेच्या भोर शाखेचे अध्यक्ष डॉ. प्रदीप पाटील,
संयोजन समितीचे अध्यक्ष राजन घोडेस्वार व संमेलनाचे आदी मान्यवर उपस्थित होते. गोव्यात नवीन आलेल्या बाहेरच्या नागरिकांनी मूळ गोवेकरांना ज्या गोष्टी माहीत नव्हत्या त्या शिकविल्या, त्यामुळे गोव्याचे वातावरण बदलून गेल्याची खंत दामोदर मावजो यांनी आपल्या भाषणात व्यक्त केली.
आपण संविधानाचे रक्षण केले तर ते आपले करील आपण सर्व सहन करत राहणे हे संविधान विरोधी आहे, असे किरण माने म्हणाले. नव्या लेखकांनी फुले शाहू आंबेडकर यांचे विचार सध्याच्या परिस्थितीनुसार लिहिणे गरजेचे असल्याचे मत डाँ.विजय खरे यांनी मांडले.
यावेळी संमेलनात चंद्रकांत जगताप, कश्यप साळुंके विकास निकम डॉ. संतोष गायकवाड, रवींद्र संकपाळ, डॉ. मेघना भोसले, विलास खरात यांचा त्यांचे कार्यक्षेत्रात अलौकिक कार्य केल्याबद्दल सत्कार करण्यात आला.