पुणे -राज्यातील इयत्ता नववी ते बारावीच्या शाळा सुरू होऊन महिना होत आहे. शाळांमधील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत दिवसेंदिवस वाढ होत असून सद्य:स्थित एकूण 19 टक्के उपस्थिती आहे.
करोनामुळे आठ महिने शाळा बंद होत्या. 15 जूनपासून ऑनलाइन शिक्षण सुरू केले. त्यानंतर टप्प्याटप्प्याने शाळा सुरू करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. पहिल्या टप्प्यात इयत्ता नववी ते बारावीच्या शाळा 23 नोव्हेंबरपासून सुरू झाल्या. विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबाबत पालकांचे संमतीपत्र सादर करण्याचे बंधन घातल्याने सुरुवातीला शाळांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी होती.
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडून विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबाबत अहवाल तयार केला आहे. राज्यात नववी ते बारावीच्या 22 हजार 204 शाळा असून यातील विद्यार्थ्यांची संख्या 56 लाख 48 हजार 28 आहे. 23 नोव्हेंबरला 9 हजार 127 शाळा सुरू झाल्या. त्यातील 2 लाख 99 हजार 193 विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावली. 2 डिसेंबर रोजी 11 हजार 322 शाळा सुरू झाल्या होत्या व त्यात 4 लाख 91 हजार 962 विद्यार्थी हजर होते.
9 डिसेंबरला 11 हजार 410 शाळांमध्ये 6 लाख 4 हजार 884 विद्यार्थी उपस्थित होते. 14 डिसेंबरला 16 हजार 620 शाळांमध्ये 10 लाख 72 हजार 490 विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावली. आता 70.3 टक्के शाळा सुरू झाल्या आहेत.
पुणे जिल्ह्यात 34.9 टक्के शाळा सुरू
पुणे जिल्ह्यात 2 हजार 68 शाळा आहेत. त्यात 12 लाख 3 हजार 128 विद्यार्थी आहेत. सद्य:स्थितीत 721 शाळा सुरू असून 48 हजार 453 विद्यार्थी उपस्थित असल्याचे आढळून आले. या ठिकाणच्या 34.9 टक्के शाळा सुरू झाल्या असून 4 टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती आहे, असे अहवालात नमूद केले आहे. दरम्यान, राज्यात कोल्हापूर जिल्ह्यामधील शाळामध्ये सर्वाधिक 64.7 टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती आहे. मुंबई, ठाणे, नाशिक या भागांत अद्याप एकही शाळा सुरू झालेली नाही.