नारायणगाव – जुन्नर तालुका कृषीप्रधान तालुका असून भविष्यात तालुक्याचा विकास करून पुढे जायचे असेल तर दूरदृष्टीचा नेता म्हणून देशाचे नेते शरद पवार यांच्याशिवाय पुढे जाता येणार नाही असे आमदार अतुल बेनके यांनी नमूद केले. श्री विघ्नहर कारखान्याच्या इथेनॉल लोकार्पण सोहळ्यात आमदार बेनके बोलत होते. तालुक्यातील शेतकरी शरद पवार यांच्याकडे मोठ्या आशेने बघत आहे. जुन्नर तालुक्याचे सर्वात मोठे वैभव तालुक्यातील धरणे व त्यातील पाणी असल्याचे त्यांनी नमूद केले.
यंदाचे वर्ष दुष्काळाचे असले तरी जुन्नर तालुक्यासाठी हक्काचे पाणी कसे राखून ठेवता येईल याचा निर्णय कालवा सल्लागार समितीने घेतलेला आहे. पुढच्या वर्षी दुष्काळ पडला तर पाण्याचा वापर काटकसरीने करावा लागेल. भविष्यात पाण्यासाठी धरणाच्या शेजारची गावे व जिल्ह्यांबरोबर वादाला सामोरे जावे लागेल; परंतु पाण्याचा वाद राजकीय पक्षाचा नसून तालुक्यातील सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांना एकत्रितपणे येऊन त्यावर ठोस पावले उचलावी लागतील.
आपण पाण्याचे संरक्षण जोपर्यंत करीत नाही तोपर्यंत आपल्याला शेती करताना कठीण प्रसंगाला सामोरे जावे लागेल. तसेच जुन्नर तालुक्यात सात गडकिल्ले, अष्टविनायकाचे दोन गणपती व 319 लेणी आहेत. येथील हवा, माणसे समृद्ध विचाराने पुढे जाणारे असून वास्तव्यासाठी चांगला आहे, असे सांगितले.
इथेनॉल प्रकल्प महत्त्वाचा
शरद पवार यांच्या हस्ते लोकार्पण झालेला इथेनॉल प्रकल्प शेतकर्यांच्या हितासाठी असल्याने ऊस उत्पादक शेतकर्याला अधिकचा भाव मिळणार आहे. श्री विघ्नहर कारखान्याने सुरू केलेला इथेनॉल प्रकल्प जुन्नर व आंबेगावच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे, असे आमदार बेनके यांनी नमूद केले.