जुन्नर : प्रत्येक भागाला आपले एक वैशिष्ट्य असते. कधी राजकीय पार्श्वभूमी असते, कधी नैसर्गिक तर कधी धार्मिक. पण क्वचितच काही भाग असे असतात की त्याला एक नाही तर अनेक वैशिष्ट्ये लाभलेली असतात. अशाच भागापैकी एक म्हणजे जुन्नर तालुका.
जुन्नर तालुका म्हणजे निसर्गाने भरभरुन कृपा केलेला भूभाग. हा भाग कृषीदृष्ट्या सुबत्त आहे. तालुक्यात पाच धरणे आहेत. तर शिवनेरी, जीवधन, हडसर, हिरडे, चावंड असे किल्ले आहेत. जवळच हरिश्चंद्र गड आहे. निसर्गरम्य नाणे घाट, आणे, माळशेज घाट, दर्या घाट म्हणजे बहुरंगी निसर्गाची ही प्रतिकेच आहेत. तालुक्यात पाच मोठी देवस्थाने आहेत. ओझर, लेण्याद्री ही अष्टविनायकांची मंदिरे, जगद्गुरू संत तुकारामांचे गुरु बाबाजी चैतन्यांची संजीवन समाधी, शिवनेरीवरील शिवाई, पांडवकालीन कुकडेश्वरर आणि तालुक्यातल्या आळे येथील ज्ञानेश्वरांनी वेद वदवून घेतलेल्या रेड्याची समाधी. पुरेसा पाऊस, अतिशय सुपीक जमीन असलेला हा तालुका केवळ इतक्याच कारणासाठी वैशिष्ट्य आहे, असे नाही.
आपल्याला जुन्नर म्हटले की आठवतो तो शिवनेरी किल्ला आणि छत्रपती शिवराय. अवघा महाराष्ट्र जागवून स्वराज्य स्थापन करणारे छत्रपती हे युगपुरुषच होते आणि त्यांचा जन्म जुन्नर तालुक्यात झाला हे जुन्नर तालुक्यातील प्रत्येकालाच प्रचंड अभिमानाचे आहे. जुन्नर तालुका आणखी अनेक वैशिष्ट्यांनी भरलेला आहे. साक्षरतेबाबत तालुका जिल्ह्यातच काय पण महाराष्ट्रात अग्रेसर आहे. शिक्षणाचे महत्त्व जाणून तालुक्यात शिक्षणाची अद्ययावत सुविधा निर्माण करणारे अनेक धुरीण या तालुक्यात होवून गेले आहेत. महात्मा ज्योतिबा फुले यांचे उजवे हात समजले जाणारे कै. कोंडाजी डुंबरे ओतूरचेच. सत्यशोधक चळवळीची खरी सुरुवात या तालुक्यातच झाली आणि मुलींची दुसरी किंवा तिसरी शाळा या तालुक्यात ओतूरलाच सुरू झाली. ही शाळा महात्मा ज्योतिबा फुले यांनी कै. कोंडाजी डुंबरे यांच्याकडून कली.
ओतूर येथे शनिवारी पुस्तक प्रकाशन
जुन्नर तालुका जसा निसर्ग संपन्न आहे तसाच तो अनेक व्यक्तींच्या कार्यामुळे संपन्न आहे. आपल्याला काही ठळक नावेच माहित असतात. ज्यांचे कार्य असामान्य आहे; परंतु अशा प्रसिद्धी परांगमुख व्यक्तींची संख्याही खूप मोठी आहे. संजय नलावडे यांनी ‘शिवनेरीची श्रीमंती : निसर्गरम्य जुन्नर, भूमी गुणी जनांची’ हे पुस्तक लिहिले आहे आणि त्याचे प्रकाशन शनिवारी (दि. 16) ओतूर येथे होत आहे. नलावडे हे स्तंभलेखक आहेत. त्यांनी तालुक्यातली ही असामान्य व्यक्तिमत्वे निवडून त्याचे कार्य, व्यक्तिमत्व या पुस्तकात अतिशय प्रभावीपणे सादर केले आहे. केवळ ढोबळपणे ही शब्दचित्रे रेखाटलेली नाहीत, तर या प्रत्येक व्यक्तीची विचार धारा, ज्या काळात त्यांनी कार्य केले त्या काळाच सुयोग्य संदर्भ, त्या कामाचा समाजावर पडलेला प्रभाव हे सगळे खूप प्रभावीपणे मांडले आहे. या पुस्तकाला डॉ. मंडा खांडगे यांची प्रस्तावना आहे. या पुस्तकाचे महत्त्व अशासाठी अधिक आहे की, यामुळे भावी पिढीला आपल्या भागाचा इतिहास समजतो. त्या-त्या काळातले सामाजिक जीवन समजते आर्थिक परिमाणे समजतात. समाजाचे परिवर्तन कसे कसे झाले आहे याचे दस्तावेजीकरण (डॉक्युमेंटेशन) होते. जी असामान्य व्यक्तिमत्वे आताच्या पिढीला अपरिचित आहेत त्यांना प्रकाशात आणून त्यांचे कार्यसमोर मांडण्याचे मोठे काम होते. संजय नलावडे यांनी एक मोलाचे काम केले आहे.