पुणे जिल्हा : पालकांनी मुलांच्या आवडीनुसार शिक्षण द्यावे -जयसिंह मोहितेपाटील

अकलूज – अकलूज शिक्षण प्रसारक मंडळाने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबवलेल धोरण, शिक्षकांचे परिश्रम आणि पालकांची साथ यामुळे विद्यार्थी यशस्वी होत असल्याचे दिसते. पालकांनी मुलांच्या आवडीनुसार शिक्षण द्यावे, असे मत शिक्षण प्रसारक मंडळाचे जेष्ठ मार्गदर्शक संचालक जयसिंह मोहिते पाटील यांनी व्यक्त केले.
स्मृतीभवन शंकरनगर येथे शिक्षण प्रसारक मंडळातील इ. 10वी, 12 वी, नीट, जेईई, सीएटी यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा सत्कार जयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते पाटील, संचालिका कु. स्वरूपाराणी मोहिते पाटील, सचिव अभिजीत रणवरे, सहसचिव हर्षवर्धन खराडे, संचालकमंडळ आदी मान्यवर उपस्थित होते.
जयसिंह मोहिते पाटील पुढे म्हणाले, ग्रामीण भागातील व सामान्यमुलांना उच्च शिक्षण मिळावे हे सहकार महर्षींचे स्वप्न होते. गुणवत्ता प्राप्त केलेले विद्यार्थी मोठ्या संख्येने सर्वसामान्य कुटुंबातील आहेत. त्यामुळे सहकार महर्षिंचे स्वप्न साकार होत असल्याचे दिसते. 10 वी, 12वी बोर्ड परीक्षेसह भविष्यातील नीट, जेईई, सीईटी अशा स्पर्धा परीक्षांचा अभ्यास ही काळाची गरज आहे. संस्थेच्या रत्नाई स्पर्धा परीक्षा केंद्रातून विद्यार्थी शहराच्या तुलनेत मोठी गुणवत्ता प्राप्त करीत आहेत. प्रास्ताविकात स्वरूपाराणी मोहिते पाटील म्हणाल्या, शिक्षण प्रसारक मंडळाचे विद्यार्थी गुणवत्तेबरोबरच कला, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रातही उल्लेखनीय कामगिरी करीत आहेत. यावेळी त्यांनी 10वी, 12वी व स्पर्धा परीक्षेत संस्थेच्या वाढत्या गुणवत्तेचा आढावा घेतला.
10वी मध्ये संस्थेत प्रथम आलेली कु. युगंधरा रामदासी, ऋषिकेश कुंभार व श्रेयस पवार यांच्यासह एकूण 105 विद्यार्थ्यांचा, तर 12 वी तील संस्थेत प्रथम आलेले सानिया बागवान, मुग्धा निंबाळकर, आदिती शिकारे यांच्यासह 67 विद्यार्थ्यांचा, व रत्नाई स्पर्धा परीक्षा केंद्रातील वेदांत जाधव, आयुष भिंगे, सोनाली गोलारे यांच्यासह 20 विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा सत्कार उपस्थितांच्या हस्ते झाला. संस्थेत व विषयात प्रथम तीन आलेल्या विद्यार्थ्यांना संस्थेच्या वतीने रोख रकमेची बक्षिसे देण्यात आली.





