कापूरहोळ – करोनामुळे नागरिक मोबाइलबरोबर इतके एकरूप झाले आहेत की, आता किरकोळ खरेदीसाठी ऑनलाइनचा उपयोग होत आहे. एक काळी स्थानिक बाजार पेठेशिवाय खरेदीला पर्याय उपलब्ध नव्हता; पण आता मात्र ऑनलाइन कोणतीही वस्तू घरपोच मागवता येत आहे.
ग्रामीण भागातील बहुतेक नागरिक खरेदीसाठी तालुक्यातील बाजार पेठेत जात होते. आता मात्र येथे देखील ऑनलाइन खरेदीचे पेव फुटले असून, ऑनलाइन वस्तू घर पोच मिळत आहेत. विशेष म्हणजे बाजारपेठेपेक्षा या वस्तू कमी किमतीत उपलब्ध होत असल्याने नागरिकांचा ऑनलाइन वस्तू खरेदीकडे कल वाढीस लागला आहे. मात्र, या प्रकारे खरेदीत वाढ होत असल्याने स्थानिक व्यापाऱ्यांना मोठा फटका बसत आहे.
ऑनलाइन खरेदीमुळे वेळ आणि पैसा अशी दोन्हीची बचत होत आहे. वस्तू खरेदीसाठी कुठल्याही दुकानात जाण्याची गरज भासत नाही. याचबरोबर रोख रक्कम देखील जवळ बाळगावी लागत नाही. या खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत, त्यामुळे ऑनलाइन व्यवहारात मोठी वाढ झाली असून किरकोळ वस्तूपासून किराणा सामान आणि लहानसहान मशिनरी देखील घरी बसून खरेदी होत आहेत.
अर्थातच याचा विपरीत परिणाम स्थानिक बाजारपेठांवर याचा विपरीत परिणाम होत असून, लाखोंची गुंतवणूक करून थाटलेली दुकाने ग्राहकांअभावी ओस पडू लागली आहे. ऑनलाइन खरेदीत थोडी बचत होत असली तरी काही वेळेस वस्तू खरेदी मागे फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
ऑनलाइन खरेदीमुळे मोबाइल दुकानदारांना सर्वाधिक फटका बसला आहे. यात नगदी खरेदी करणारा नागरिक या खरेदीकडे मोठ्या प्रमाणात वळत आहेत. ग्रामीण भागातील नागरिकसुध्दा ऑनलाइन खरेदी करण्यास पसंती देत आहेत. मात्र, आपला स्थानिक व्यापारीसुध्दा टिकला पाहिजे याकडे ग्रामीण भागातील नागरिकांनी लक्ष दिले पाहिजे व सहकार्य केले पाहिजे.
सागर कामठे, मोबाइल दुकानदार, नसरापूर