पुणे – गेल्या आठवड्यापासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. तर सोमवारी (दि. 14) अनेक भागांत पावसाच्या तुरळक सरी बरसल्या. या अवकाळी पावसाने आणि वातावरणातील बदल हे पिकांसाठी धोकादायक असून कीड आणि रोगांसाठी पोषक वातावरण तयार झाले. रब्बी हंगामातील हरभरा, गहू, ज्वारी तर खरिपातील तूरसह डाळिंब, द्राक्ष, आंबा या फळपिकांसह भाजीपाला अडचणी आला आहे. त्यातच पहाटे दव-धुक्यामुळे पिकांचे नुकसान वाढण्याची भीती असून शेतकऱ्यांचा खर्चही वाढणार असल्याने बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे.
यंदा पहिले करोना, लॉकडाऊन, निसर्ग चक्रीवादळ, अतिपाऊस आणि आता कीड आणि रोगाच्या प्रादुर्भाव त्यातच बाजरभाव नाही या अनेक संकटांना तोंड देतादेता शेतकरी घायकुतीला आला आहे. खिशात पैसा नाही त्यातच आता रब्बी हंगाम वाचविण्यासाठी हजारो रुपायांची औषधे विकत घ्यावी लागणार आहे, पण त्यासाठी पैसे आणायचे कोठून?
आधीच डोक्यावर कर्ज ते कसे फेडायचे अन् नवीन कर्ज मिळणार का? या आणि अनेक प्रश्नांमुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. शेती आणि संसाराचा गाडा सांभाळता सांभाळता तो कंगाल झाला आहे. त्यात केंद्र, आणि राज्य सरकारकडून दिलासा मिळत नसल्याने तो आणखीनच अडचणीत आला आहे.
डिसेंबर महिना सुरू असून कडाक्याची पडणारी थंडी ही पिकांना पोषक असते. विशेषत: गव्हाची वाढ आणि दाणे भरणे हे थंडीच्या कडाक्यावरच अवलंबून असते. मात्र, मागील तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने गव्हाची वाढ खुंटली आहे. दाणे भरणीवरही ढगाळ वातावरणाचा परिणाम होत असून ज्वारीवर चिकटा रोग तयार होण्याची भीती व्यक्त होत आहे.
जिल्ह्यात सोमवारी पाऊस झाला मात्र, मंगळवारी पहाटे दाट धुके पडले होते. आणखी काही दिवस पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. एकदा पाऊस गेल्यानंतर थंडी सुरू होईल तसेच कोरडे वातावरण राहणार आहे. त्यामुळे द्राक्ष बागांवर भुरीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे.ज्या बागेत सेटिंग झाले आहे. तेथे अडचणी वाढतील. पावसानंतर धुके आणि दवाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. ज्या ठिकाणी दव आणि धुक्याचे प्रमाण जास्त काळ टिकून राहते तेथे डाऊनीचे बिजाणू पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे, त्यामुळे द्राक्ष बागायतदारांनी याकडे वेळीच लक्ष द्यावे, असे कृषी तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
सीताफळाचा बहर सध्या संपलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी बागा ताणावर सोडलेल्या असल्याने या वातावरणाचा फारसा परिणाम जाणार नसल्याने सीताफळ उत्पादक शेतकऱ्यांना थोडा दिलासा मिळाला असला तरी यंदा भाव न मिळ्याने तो आधीच अडचणीत आला आहे. हे ढगाळ वातावरण आणखी काही दिवस राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. जर हे वातावरण आणखी लांबले तर भाजीपाला पिकांवर करपा, केवडा या रोगांसह फूले, मावा किड्यांचा प्रादूर्भाव होण्याची शक्यता शेती तज्ज्ञांनी व्यक्त
केली आहे.
डाळिंब बागांना धोका
सध्या मृग बहराची फळे डाळिंब बागेत आहेत. या महिन्यात अणि पुढील महिन्यात फळांची काढणी होणार आहे. मात्र, हा अवकळी पाऊस अधिक लांबला तर फळांवर बुरशीजन्य आणि जिवाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव पसरण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत. तव्र ज्या बागेत करपा रोगाचा प्रादुभाव झाला आहे, त्या-त्या ठिकाणी या वातावरणामुळे आणखी प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता असल्याने शेतकऱ्यांना डोळ्यात तेल घालून बागांकडे लक्ष द्यावे लागणार आहे.
रब्बी पिकांवर “मावा’चा प्रादुर्भाव
या बदलत्या वातावरणामुळे रब्बी हंगामातील ज्वारी, हरभरा, गहू आदी पिकांवर मावा किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. काही भागामध्ये हरभऱ्यावर घाटे अळीचा प्रादुर्भाव झाला असल्याने शेतकरी किटकनाशकांची फवारणी करीत आहे.