वाल्हे – मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे; तसेच मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांना हरणी (ता. पुरंदर) गावाने पूर्ण पाठिंबा दर्शवण्यात आला आहे. तसेच सर्व राजकीय पक्षांना पुढारी, नेते यांना गावबंदी करण्यात आली असून, कोणत्याही, राजकीय नेत्यांनी, पुढाऱ्यांनी गावात प्रवेश करण्याच्या प्रयत्न केल्यासर पुढील परिणाम, सरकार जबाबदार राहील. आरक्षण मिळेपर्यंत लोकशाही मार्गाने होणाऱ्या निवडणुकीवर ग्रामस्थांचा बहिष्कार राहील असा निर्धार हरणी येथील ग्रामस्थांनी केला आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी हरणी येथील तरुणांनी साखळी उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे. हरणी येथे एक दिवसाचे उपोषण करण्याचा निर्णय झाला होता; मात्र रविवार (दि. 29) सकाळी झालेल्या बैठकीमध्ये साखळी उपोषणाचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला असून या साखळी उपोषणासाठी दररोज तीन व्यक्ती उपोषणास बसणार आहेत.
हरणी येथील तरुण राहुल हनुमंत यादव यांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने ग्रामपंचायत कार्यालयासमोर साखळी उपोषण करण्याचा निर्णय घेतला असून, त्यांना ग्रामस्थांनी पाठिंबा दिला आहे.
याबाबत, हरणी येथील तरूणांनी पुरंदर तहसीलदार यांना निवेदन दिले आहे. यावेळी, राहुल यादव, किरण डोईफोडे, सरपंच धनंजय यादव, महेश यादव, अश्विन यादव, ज्योतीराम चव्हाण, विजय यादव, मोहन यादव, प्रेम यादव, पोलीस पाटील धनंजय यादव, मच्छिंद्रनाथ यादव हे कार्यकर्ते सहभागी झाले होते.