श्री पांडुरंगरायांचा पायी पालखी सोहळ्याचे परतीच्या प्रवासात जोरदार स्वागत
वाल्हे – ज्ञानोबा माऊऽऽली तुकाराम हरिनामाचा जयघोष करीत, महर्षी वाल्मिकी ऋषी की जयच्या जयघोषात कपाळी बुक्का, गंध लावुन खांद्यावक भगव्या पताका उंचावत शेकडो वैष्णवांनी टाळ-मृदंगाच्या गजराने वाल्हे गाव दुमदुमले होते.
शुक्रवारी (दि. 15) आद्यरामायणकार महर्षि वाल्मिकीऋषींच्या वाल्हेनगरीत श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा संजीवन समाधी सोहळा संपवून श्रीक्षेत्र पंढरपूर येथील श्री पांडुरंगरायांचा पायी पालखी सोहळा आद्यरामायणकार महर्षि वाल्मिकी ऋषींच्या संजीवनी समाधी स्थळी शुक्रवार (दि.15) सायंकाळी विसावला.
आळंदी ते पंढरपूर पायी वारी पादुका पालखी सोहळा उरकून परतीचा प्रवास सुरू झाला आहे. सासवड येथील गुरुवार (दि.14) मुक्काम आटोपून, आद्यरामायणकार महर्षि वाल्मिकी ऋषींच्या समाधी मंदिर परिसरात पायी पालखी सोहळा आल्यानंतर, वाल्हेकर ग्रामस्थांनी श्री पांडूरंगाच्या पालखीचे जोरदार स्वागत केले.
महर्षि वाल्मिकी ऋषींच्या संजीवनी समाधी मंदिर परिसरात पालखी आल्यानंतर, ग्रामस्थांनी पालखी खांद्यावर घेऊन, वाल्मिकी मंदिरात ठेवली. यावेळी, टाळ मृदंगाचा गजर ज्ञानदेव तुकारामांच्या जयजयकाराने संपूर्ण मंदिर परिसर भक्तिमय झाला होता. यावेळी शेकडो भाविकांच्या उपस्थितीमध्ये आरती झाली. शनिवार (दि.16) पहाटे तरडगाव येथील मुक्कामासाठी श्री पांडूरंगाचा पालखी सोहळा पहाटे मार्गस्थ होणार असल्याची माहिती श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने पालखी व्यवस्थापक संदीप कुळकर्णी यांनी दिली.