पेठ – गेल्या काही दिवसांपासून वृद्ध आई-वडिलांना रस्त्यावर किंवा कुठल्या तरी गावात नेऊन सोडण्याच्या घटनांमध्ये वाढ होऊ लागली आहे. अशीच घटना माळेगाव (ता. आंबेगाव) येथे नुकतीच घडली. वृद्ध वडिलांना या गावात सोडून देण्यात आले होते; पण पत्रकाराच्या दक्षतेमुळे या वृद्ध व्यक्तीला त्याच्या कुटुंबियांनी पुन्हा घरी नेले आहे.
भारतीय संस्कृतीमध्ये चार आश्रम सांगितले आहेत. त्यापैकी गृहस्थाश्रम अत्यंत महत्त्वाचा समजला जातो. यामध्ये आई-वडील आपल्या मुलाला जन्म देऊन त्यांच्यावर संस्कार करतात. वेळप्रसंगी अनेक अडचणींचा सामना करत मुलांचे शिक्षण, आरोग्य आणि त्यांच्या भौतिक गरजा काटकसर करून त्याला देण्याचा प्रयत्न करतात.
मात्र, मोठे झाल्यावर ज्या आई-वडिलांनी आपल्याला लहानाचे मोठे केले आहेत हे विसरून हीच मुले वडिलांच्या नावे असलेला जमीनजुमला स्वतःच्या नावे झाली की वृद्ध आई-वडिलांना रस्त्याच्या कडेला सोडून देत असून, ही वृत्ती समाजामध्ये वाढत चालली आहे.
पेठ-माळेगाव (ता. आंबेगाव) हद्दीनजीक एका वृद्ध व्यक्तीला असेच सोडून देण्यात आले होते.गेल्या दोन-तीन दिवसांपासून या अनाथ आणि बेवारस अशा आढळून आलेल्या वृद्ध व्यक्तीला हाय-वेलगतच्या परिसरातील बाबाजी ढमाले, सुनील ढमाले, विवेक काळे, दिलीप काळे, प्रकाश ढमाले या तरुणांनी त्या वृद्ध माणसाची चौकशी करून त्यांना दोन ते तीन दिवस अन्नपाणी देऊन त्याच्याकडून त्याच्या कुटुंबियांची माहिती काढून घेतली. या बाबांना दोन मुले असल्याचे लक्षात आले.
त्यानंतर त्याच्या कुटुंबियांना त्यांच्याबाबत कळवण्यात आले. या बाबांचा मोठा मुलगा मयत आहे. मयत मुलाच्या मुलाने म्हणजे बाबाच्या नातवाने येण्यासाठी टाळाटाळ केली; पण परिसरातील तरुणांनी पेठ येथील दैनिक “प्रभात’चे पत्रकार दिलीप धुमाळ यांना ही घटना कळवली असता ज्येष्ठ नागरिक कायद्यानुसार या मुलांवर गुन्हे दाखल होऊ शकतो हे स्पष्ट करण्यात आले.
याचबरोबर पत्रकाराने संबंधित पोलिसांशी संपर्क साधल्याचे कुटुंबियांना दिसून आल्यानंतर कुटुंबातील सदस्य या बाबांना घरी घेऊन जाण्यासाठी तयार झाले. हे बाबा खेड तालुक्यातील एका गावातील आहेत. धक्कादायक बाब म्हणजे या बाबांचा दुसरा मुलगा घटनास्थळी आला नाही.