मोरगाव – बारामती तालुक्याच्या पश्चिम भागात पाण्याअभावी भयंकर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी शेतकर्यांना दाहीदिशा करावी लागत आहे. तसेच दुभत्या जनावरांना हिरवा चारा मिळेनासा झाला असल्याने दुधावर परीणाम होत शेतकर्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. यामुळे चाराडेपो सुरुरू करण्याची मागणी शेतकर्यांची आहे.
तालुक्याच्या पश्चिम भागातील तरडोली, मोरगाव, लोणी भापकर,पळशी, मासाळवाडी, मुर्टी, मोढवे,आंबी बुद्रुक, आंबी खुर्द, जोगवडी आदी भागामध्ये मोठ्या प्रमाणात दुष्काळ परिस्थिती निर्माण झालेली आहे. या भागामध्ये जनावरांच्या चार्याची बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. तालुक्याच्या ग्रामीण भागातील बहुतांश शेतकर्यांचे आर्थिक गणित दुधावर अवलंबून आहेत या भागातील 70 टक्क्यांपेक्षा अधिकांकडे दुभती जनावरे आहेत.
मोरगाव पशुधन विकास कार्यालया अंतर्गत मोरगाव, तरडोली, आंबी बुद्रुक, खुर्द, चांदगुडेवाडी, राजबाग, शेरेवाडी ही सात गावे असून या भागात लहान मोठी गायी-म्हशी 5 हजार पेक्षा अधिक जनावरे असून शेळ्या-मेंढ्या 3 हजार पेक्षा अधिक आहेत. दुष्काळाची गंभीर परिस्थिती निर्माण होऊन, रब्बी हंगामातील पिकांना पाणी द्यायचे कोठून? असा प्रश्न निर्माण झाल्याने बारामतीच्या पश्चिम भागात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे.
चारा डेपो सुरू करा
या भागात कमी प्रमाणात पाऊस झाला असल्याने दुष्काळ स्थिती आहे. कुपनलिका व विहरींनी तळ गाठला आहे. पिण्याच्या पाण्यासाठी दाही दिशा करावी लागत आहे. तर चारा चढ्या दराने घ्यावा लागत आहे. दुभत्या जनावरांसाठी ऊस प्रती गुंठा साडेपाच हजार रुपये तर मका साडेतीन हजार रुपये दराने घ्यावा लागत आहे. यामुळे शेतकर्यांनी तालुक्याच्या पश्चिम भागात चारा डेपो किंवा चारा छावण्या सुरु करण्याची मागणी काल भेट दिलेल्या केंद्रीय पथकाकडे व शासनाकडे केलेली आहे.
टँकरही सुरू करा
जनावरांना चारा, पाणी मिळणे कठीण झाले असून शेजारील तालुक्यातून अनेक शेतकरी जनावरांचा चारा शोधून आणून पशुधन टिकविण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, विकतचा चारा घेऊन, पशुधन टिकवणे म्हणजे तारेवरील कसरत होत आहे. आगोदरच दुधाचा दर पाण्याच्या एक लिटर बाटली ऐवढा मिळत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात आहे. यातुन पशुधन टिकविणे अवघड होत आहे. तर रब्बी हंगामातील पिकांना खते व पाणी कसे द्यायचे ? असा प्रश्न शेतकर्यांसमोर आहे. पाऊस नसल्याने, दुष्काळाचे सावट उभे राहिले आहे. त्यामुळे चारा छावणीसह टँकरची मागणी आता जोर धरू लागली आहे.