Pune District : ऊस पाचट व्यवस्थापन करा कृषी विभागाचे शेतकर्यांना आवाहन

बारामती : शेतकर्यांनी उसाचे पाचट न जाळता त्याचे व्यवस्थापन करावे, यामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब आणि जमिनीची सुपीकता वाढ होण्यासोबतच जमिनीचा पोतही सुधारण्यास मदत होते, त्यामुळे अधिकाधिक शेतकर्यांनी ऊस पाचट व्यवस्थापन करावे, असे आवाहन कृषी विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.
कुरणेवाडी येथे ‘क्रॉपसॅप’अंतर्गत आयोजित ऊस पीक शेतीशाळा आयोजित करण्यात आली. यावेळी वडगाव निंबाळकर कृषी पर्यवेक्षक प्रताप कदम, कृषी सहायक प्रवीण गायकवाड, शेतकरी तानाजी पवार, पांडुरंग काळभोर, दत्तात्रय काळभोर, संजीवन सावंत, बाळासाहेब कोकरे, चंद्रशेखर पवार, छाया पवार, जागृती सावंत, शिवाजी तावरे, कांतीलाल शिंदे, मयूर शेडगे आदी शेतकरी उपस्थित होते.
कदम म्हणाले की, उसाची तोडणी झाल्यानंतर उसाचे पाचट कुट्टी करावी. उसाचे बुडक्यावरील पाचट बाजूला सारून बुडके छाटणी करावी. त्यानंतर दहा लिटर पाण्यामध्ये दहा ग्रॅम बाविस्टिन याची फवारणी करून घ्यावी. प्रती हेक्टरी 80 किलो युरिया, 100 किलो सिंगल सुपर फॉस्फेट, 500 किलो शेणखतामध्ये 10 किलो पाचट कुजविणारे जिवाणू मिसळून घ्यावे जेणेकरून पाचट लवकर कुजेल आणि त्याचा लाभ होईल, असे असे आवाहन कदम यांनी केले.





