केंदूर / शिक्रापूर -जातेगाव खुर्द (ता. शिरूर) येथे दोन दिवसांपूर्वी बिबट्याने वासराचा फडशा पाडला होता. त्यामुळे या ठिकाणी बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थ व नागरिकांनी केली होती. त्यामुळे वनविभागाने बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावला आहे, यामुळे ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे.
जातेगाव खुर्द या ठिकाणी काही दिवसांपासून बिबट्याचे दर्शन होत आहे. दोन दिवसांपूर्वी येथील भाऊसाहेब वावरे यांच्या गोठ्यातील वासराला बिबट्याने ठार केले. मात्र बिबट्याच्या दहशतीने या भागातील शेतकरी व ग्रामस्थ भयभीत झाले. त्यामुळे बिबट्याचा वनविभागाने बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली होती.
त्यानुसार शिरूर वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक सोनल राठोड यांनी त्याठिकाणी पिंजरा लावला आहे. यावेळी भाऊसाहेब वावरे, राजू रोकडे, नटू सुक्रे, सुरेश जाधव, लखन ढोबळे यांसह आदी उपस्थित होते.
जाधववाडीत शेळी ठार –
जाधववाडी (ता. जुन्नर) या ठिकाणी बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एक शेळी मृत्यूमुखी पडली आहे.
जाधववाडी येथील संदीप जाधव यांच्या शेतात पांडुरंग माने या मेंढपाळाचा वाडा बसवलेला असताना मंगळवार (दि. 15) पहाटेच्या सुमारास बिबट्याने अचानकपणे वाड्यावर बसवलेल्या मेंढ्यावर व शेळ्यांवर हल्ला करून एका शेळीला वाड्यापासून शेळीचा मानेला पकडुन जोरात फरफटत नेले. या झालेल्या हल्ल्यात या शेळी जागीच मृत्यूमुखी पडली.
या मेंढपाळाचे सात ते आठ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच याच गावात तुळशिदास जाधव यांच्या शेतात ऊस तोडणी चालू असताना ऊस तोडणी कामकारांणा बिबट्याचे दर्शन झाल्याने येथील ऊस तोडणी बंद केली.
दरम्यान जुन्नर तालुक्यात उसाचा प्रमाण मोठया प्रमाणावर असून सध्या ऊस तोडणी चालू असून या बिबट्यांना लपण न राहिल्याने हे बिबटे माऊली वस्तीमध्ये येऊ लागले आहेत. बिबट्या पकडण्यासाठी वनविभागाने पिंजरा लावावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.