सागर येवले – चांदणी चौकासह शहरभर वाहतुकीचा प्रश्न भीषण झाला आहे. अशा स्थितीतही नियोजन करण्याएवजी पोलीस कर्मचारी पावत्या फाडत असतात. पुणेकरांना दररोज त्रिकाळ भेडसावणाऱ्या या प्रश्नाला वाचा फोडत मंत्री चंद्रकांत पाटील यांनी थेट पोलीस उपायुक्तांनाच “गोड’ शब्दांत समज दिली. यामुळे आता तरी पोलीस मनावर घेतील आणि वाहतूक कोंडीवर तोडगा काढतील, अशी आशा पुणेकर बाळगून आहेत.
चांदणी चौकातील नवीन उड्डाणपूल आणि रस्ता रुंदीकरणामुळे या मार्गावरील दररोजच्या वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त झाले आहेत. या कोंडीचा फटका खुद्द मुख्यमंत्र्यांना बसला आणि सर्व यंत्रणा कामाला लागली. दुसऱ्याच दिवशी जिल्हाधिकाऱ्यांपासून पुणे आणि पिंपरी-चिंचवडचे महापालिका आणि पोलीस आयुक्त, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणासह सर्व अधिकाऱ्यांचा फौजफाटा चांदणी चौकात पाहणीसाठी आला. वाहतूक कोंडी कशी सोडवता येईल, त्यासाठी आवश्यक उपाययोजना आणि कार्यवाही याबाबत चर्चा करत कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.
या दौऱ्यानंतर राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुणे पोलीस आयुक्तलयात चांदणी चौकासह शहरातील वाहतूक कोंडी याबाबतची बैठक घेतली. बैठकीला येण्याअधी पाटील वाहतुकीचा आलेला अनुभव सांगत थेट वाहतूक विभागाच्या उपायुक्तांना सूचना दिल्या. शहरात वाहतूक कोंडीची समस्या गंभीर असताना काही प्रामाणीक कर्मचारी व अधिकारी सोडले, तर अन्य कर्मचारी रस्त्यावरील कोंडी सोडवण्याएवजी चौक किंवा चौकाच्या बाजूला उभे राहून पावत्या फाडण्यात व्यस्त असल्याचे अनेकवेळा दिसून येते. त्याचा प्रत्यय मंत्री चंद्रकांत पाटील यांना आला. त्याबाबत पाटील यांनी पोलीस अधिकाऱ्यांच्या बैठकीत मांडत, उपायुक्तांना सूचना दिल्या.
काय म्हणाले चंद्रकांत पाटील…
“रस्त्यावर वाहतूक कोंडी आहे,'”मंत्र्यांच्या गाडीचा सायरन वाजतोय’, तरीही तुमचे कर्मचारी वाहने बाजूला घेऊन पावत्या फाडण्यात व्यस्त आहेत. आता गणेशोत्सव आले आहे. भाविकांची गर्दी अधिक असणार, वाहतूक कोंडी होणार. अशा परिस्थितीत वाहतूक नियोजन सुरळीत कसे राहील, याकडे प्रामुख्याने लक्ष द्या. कर्मचाऱ्यांनी केलेल्या चुकीची जबाबदारी ही जो अधिकारी मॉनिटरिंग करतो, त्यावर येते. त्यामुळे तुमच्या अधिकारी, कर्मचारी यांना प्रेमाने समज द्या. असा शब्दात चंद्रकांत पाटील यांनी उपायुक्तांना सूचना दिल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.