पुणे – बाणेर-बालेवाडी-सुस-म्हाळुंगे गावांच्या पाणी प्रश्नावर महापालिका आयुक्तांनी प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधत समस्या जाणून घेतल्या. तसेच येथील पाणी समस्या तातडीनं सोडविण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना केल्या.
अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे, माजी नगरसेवक अमोल बालवडकर, माजी नगरसेविका ज्योती कळमकर, स्वप्नाली सायकर, गणेश कळमकर, लहु बालवडकर, प्रकाश बालवडकर, शशिकांत बालवडकर, संदीप बालवडकर, अस्मिता करंदीकर व परिसरातील सोसायटींचे नागरिक, ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.
गेल्या आठवडाभरापासून बाणेर-बालेवाडी-सुस-म्हाळुंगे परिसरात पाण्याची समस्या आहे. विशेष म्हणजे, टाक्यांमध्ये मुबलक पाणी असतानाही केवळ वितरणाचे नियोजन नसल्याने या भागातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. ही बाब लक्षात घेऊन अमोल बालवडकर यांनी चांदणी चौक येथील पाणी टाकीवर ठिय्या आंदोलन केले होते. त्यानंतर पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन पालिकेने दिले होते. या भेटीवेळी आयुक्तांनी पाणीपुरवठा विभागाने तातडीने उपाययोजना करुन वारजे येथून पाणीपुरवठा वाढविण्याचे तसेच बाणेर व बालेवाडी येथे तातडीने वाढीव पंप बसविण्याचे आदेश दिले. बालेवाडी येथील अंडरग्राउंड टाकीमध्ये पंप बसवून बालेवाडीला सुरळीत पाणीपुरवठा करण्याचे आदेश दिले.