Pune: पुरंदर तालुक्यातील खानवडी येथील ‘ज्योती सावित्री जिल्हा परिषद’ शाळा प्रकरणात चुकीची माहिती प्रसारित करणे आणि गैरवर्तन करणे प्रभारी गटशिक्षणाधिकाऱ्यांना महागात पडले आहे. या प्रकरणी जिल्हा परिषद प्रशासनाने कडक पाऊल उचलत विस्तार अधिकारी (शिक्षण) तथा प्रभारी गटशिक्षण अधिकारी गोविंद हरिभाऊ लाखे यांना तडकाफडकी निलंबित केले आहे. लाखे यांनी खानवडी येथील शाळेला भेट दिली होती. मात्र, या भेटीनंतर त्यांनी अधिकृत तथ्य न तपासता चुकीची माहिती बाहेर प्रसारित केली. यामुळे जिल्हा परिषदेसारख्या जबाबदार संस्थेची नाहक बदनामी झाल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले. या गंभीर शिस्तभंगाची दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी निलंबनाचे आदेश जारी केले. निलंबनाचे स्वरूप आणि अटी – लाखे यांच्यावर ‘महाराष्ट्र जिल्हा परिषद सेवा (शिस्त व अपील) नियम १९६४’ मधील नियम ३(१) अन्वये ही कारवाई करण्यात आली आहे. निलंबन कालावधीत लाखे यांचे मुख्यालय पुरंदरवरून हलवून पंचायत समिती वेल्हा येथे निश्चित करण्यात आले आहे.