पुणे(प्रतिनिधी): लष्कर भरती प्रक्रियेत पास करण्याचे आमिष दाखवून काही उमेदवारांची लाखो रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी लष्कराच्या इंटेलिजन्सचे अधिकारी आणि पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने दोघांना अटक केली आहे.
पोलिसांच्या प्राथमिक तपासात लष्कराच्या भरती कार्यालयातील एका कर्मचाऱ्याचा समावेशही उघडकीस आला आहे. वेनसिंग लालासिंग रावत(45, धंदा- चालक रा. पिंगळे वस्ती, मुंढवा मूळ – अजमेर, राजस्थान) व त्याचा साथीदार रवींद्र राठोड ( रा. राजस्थान), जयदेव सिंह परिहार ( हवालदार क्लार्क ) अशी आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, 31 ऑक्टोबर रोजी वानवडी येथे लष्कराच्या कार्यालयात लष्कर भरतीची परीक्षा झाली. या परिक्षेसाठी काही उभेदवारांची फसवणूक करण्यात येत असल्याची खबर पोलीस उपायुक्त(गुन्हे) बच्चनसिंग यांना मिळाली होती. त्यांनी लष्कराच्या इंटेलिजन्स कार्यालयाशी संपर्क साधला. यानंतर गुन्हे शाखा युनिट एक व पाचच्या पथकाने सापळा रचून आरोपी रावत व राठोडला ताब्यात घेतले.
आरोपींनी लेखी परीक्षेत करिता 19 मुलांना आर्मीमधील मोठ्या अधिकाऱ्यांशी ओळख असुन तुम्हाला पास करून देतो असे सांगितले होते. तसेच काम झाल्यावर प्रत्येकी एक ते दोन लाख द्या असे सांगुन त्या मुलांची मूळ कागदपत्र स्वत: च्या ताब्यात घेतली होती. मागील पंधरा दिवसापासून मुलांचे लोहगाव या ठिकाणी शिक्षक नेमून क्लास घेण्यात येत होते. स्वत:च्या बुद्धिमत्तेवर व क्षमतेवर पास होणाऱ्या मुलांकडूनच मी तुम्हाला लेखी परीक्षेत पास केले असे सांगून सिलेक्ट होणाऱ्या मुलांना ठरलेली रक्कम दिल्यानंतरच कागदपत्रे परत करण्यात येणार होती.
सदर प्रकरणात भरती (रिक्रुटमेंट) कार्यालयामधील कर्मचारी जयदेव सिंह परिहार ( हवालदार क्लार्क ) देखील सहभागी असल्याचे निष्पन्न झाले. त्यानेच मुलांना भरती व्हायचे असेल तर वरील आरोपींशी संपर्क करण्याबाबत सांगितले होते. सदर प्रकरणात अक्षय महेश साळुंखे याच्या तक्रारीवरून वानवडी येथे भा.द.वि 420,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येत आहे . दरम्यान जयदेव परिहारलाही ताब्यात घेण्यात आलेले आहे.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, उपायुक्त बच्चन सिंह, सहायक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोऱ्हाटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप, सहायक पोलीस निरीक्षक तासगावकर, जाधव, पोलीस उपनिरीक्षक शेंडगे, शेळके, पोलीस अंमलदार महेश वाघमारे, प्रविण काळभोर, दिपक लांडगे, दया शेंगर, अंकुश जोगदंड, दत्ता ठोंबरे, अय्याज वड्डीकर, दाऊद सय्यद, प्रकाश कट्टे, उत्तम तारु, विवेक जाधव, स्वप्निल कांबळे, किशोर वग्गु, चेतन गोरे, चंद्रकांत महाजन, विजय भिलारे यांच्या पथकाने केली.