नवी दिल्ली : राजधानी दिल्लीमध्ये २१ ते २३ फेब्रुवारी दरम्यान सरहद, पुणे आयोजित ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. या संमेलनाच्या दिल्ली कार्यालयाचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी झाले. यावेळी संमेलनाला राज्य सरकार सर्वतोपरी पाठबळ देईल आणि साहित्य संमेलन यशस्वी होईल, असे प्रतिपादन फडणवीस यांनी केले. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर आणि मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर हे संमेलन दिल्लीत होणार असल्याने या संमेलनाला विशेष महत्व आहे. हे संमेलन कुण्या एका व्यक्तीचे किंवा संस्थेचे नसून महाराष्ट्रासह जगाच्या पाठीवर असलेल्या सर्व मराठीजनांचे आहे, असेही फडणवीस म्हणाले. सरहद, पुणे संस्थेच्या वतीने या संमेलनाचे आयोजन केले जात आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहित्य संमेलनाचे उद्घाटक आहेत, तर ज्येष्ठ नेते शरद पवार साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत. दिल्लीतील जुन्या महाराष्ट्र सदनातील हेमंत कक्षात साहित्य संमेलनाचे कार्यालय उभारण्यात आले आहे. या कार्यालयाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांनी केले. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री तथा संमेलनाचे सरकार्यवाह मुरलीधर मोहोळ, सहसंयोजक लेशपाल जवळगे, अतुल जैन, आनंद रेखी, प्रदीप पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.