दोन महिन्यांत 516 नळजोड तोडले
पुणे – शहरातील पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून अनधिकृत नळजोडांवर कारवाईचा बडगा उभारला आहे. गेल्या दोन महिन्यांत पाणीपुरवठा विभागाकडून सुमारे 516 नळजोड तोडण्यात आले असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. समान पाणी योजने अंतर्गत पालिकेकडून करून घेण्यात आलेल्या सर्वेक्षणात 1 लाख 60 हजार नळजोड आढळून आले असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीत गतवर्षीच्या तुलनेत 10 ते 15 टक्केकमी पाणीसाठा आहे. त्यातच, उन्हाची तीव्रता अधिक आहे. ही बाब लक्षात घेऊन पाटबंधारे विभाग आणि महापालिकेकडून पाणी वापराचे नियोजन केले जात आहे. त्यामुळे दिवाळीपासूनच पालिकेकडून शहरात पाणी कपात सुरू करण्यात आली आहे. तर शहरातील अनधिकृत पाणी वापरावरही नियंत्रण आणण्यात येत आहे. त्यामुळे प्रशासनाकडून शहरातील अनधिकृत नळजोडांवर आपला कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. समान पाणी योजनेसाठी महापालिकेकडून शहरात नळजोडांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यात व्यावसायिक अस्थापनांसह मोठ्या, सोसायट्या, रुग्णालये, मंगल कार्यालये तसेच निवासी मिळकतींची तपासणी करण्यात आली होती. त्यातही अनधिकृत नळजोडांचा आकडा समोर आला असून महापालिका प्रशासनाच्या मते हे नळजोड सुमारे 1 लाख 60 हजार आहेत. त्यामुळे पालिकेकडून या नळजोडांवर कारवाई करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
समान पाणी योजनेत सर्व नळ होणार बंद
पालिकेच्या समान पाणी योजनेत शहरात 1600 किलो मीटरच्या नवीन जलवाहिन्या टाकण्यात येणार आहेत. या जलवाहिन्यांवरून नव्याने नळजोड देण्यात येणार असल्याने सर्व अनधिकृत नळजोड बंद होणार असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. या नवीन टाकण्यात येणाऱ्या जलवाहिन्यांना कोणत्याही इतर यंत्रणांना टॅब मारता येणार नाही. त्यामुळे त्यावरून केवळ पालिकेची परवानगी घेऊन नळजोड घ्यावे लागणार असल्याने सर्व अनधिकृत नळजोडधारकांना पालिकेकडे अर्ज करावे लागणार आहेत. त्यामुळे भविष्यात सर्व अनधिकृत नळजोड बंद होणार असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.