फुरसुंगी, उरुळीच्या ड्रेनेजलाइनचा 120 कोटींचा निधी इतर गावांना मिळणार
पुणे – महापालिका 2017 मध्ये नव्याने समाविष्ट केलेल्या 11 गावांसाठी तब्बल 352 कोटींची सांडपाणी योजना राबवित आहे. या गावांचे 100 टक्के सांडपाणी संकलित करून त्यावर प्रक्रिया केली जाणार आहे.
मात्र, हे काम सुरू झाल्यानंतर लगेचच शासनाने फुरसुंगी आणि उरुळी देवाची ही दोन गावे पालिकेतून वगळण्याचा निर्णय घेतल्याने महापालिकेने या दोन गावांच्या सांडपाण्यासाठी मांजरी येथे उभारण्यात येणारा तब्बल 120 कोटींचा सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय घेतला असून हा निधी उर्वरित 9 गावांमध्ये सांडपाणी वाहिन्यांचे जाळे वाढविण्यासाठी वापरण्यात येणार आहे.
याबाबतचा प्रस्ताव महापालिका आयुक्तांच्या मान्यतेसाठी ठेवण्यात आला आहे. त्यामुळे 9 गावांचा सांडपाण्याचा प्रश्न लवकरच कायमचा मार्गी लागणार आहे. मात्र, या निर्णयाचा फटका फुरसुंगी आणि उरुळी देवाची गावांना बसणार आहे. स्वतंत्र नगरपरिषदेच्या मागणीनंतर विकासकामे तसेच निधीबाबतचा हा पहिलाच प्रशासकीय फटका असल्याची चर्चा आहे.
महापालिकेने वगळेल्या दोन गावांतील कामे रद्द करण्याचा निर्णय घेतल्याने त्यासाठीच्या योजनेच्या निधीबाबतचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. परंतु, सदर योजना आणि निधीबाबत अंतिम निर्णय झालेला नाही.
– विक्रम कुमार, आयुक्त, पुणे मनपा
अन्य प्रकल्प मार्गी लागणार…
नव्याने समाविष्ट गावांच्या सांडपाण्यावर प्रक्रियेसाठी महापालिका दोन टप्प्यात काम करणार आहे. पहिल्या टप्प्यात 352 कोटींच्या कामास मान्यता देण्यात आली होती. यानुसार केशवनगर येथे 12 एमएलडी क्षमतेचे तर मांजरी येथे उरुळी देवाची आणि फुरसुंगी या दोन गावांसाठी 93 एमएलडी क्षमतेचे शुद्धीकरण केंद्र उभारले जाणार होते.
सुमारे 150 कोटींची ही कामे आहेत तर उर्वरित निधीतून या दोन गावांसह उर्वरित गावांमध्ये ट्रंकलाइन टाकण्यात येणार होत्या. दुसऱ्या टप्प्यात 9 गावांमध्ये त्यांच्या जोड लाइट टाकण्यात येणार होत्या. यासाठी सुमारे 150 कोटींचे काम होते. मात्र, ही दोन गावे वगळल्याने पालिकेने या दोन गावांतील सदर कामे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. तर, यासाठीचा निधी प्रशासन इतर 9 गावांमध्ये दुसऱ्या टप्प्यातील सांडपाणी वाहिन्यांच्या कामासाठी देणार आहे.
अन्य प्रकल्प मार्गी लागणार…
नव्याने समाविष्ट गावांच्या सांडपाण्यावर प्रक्रियेसाठी महापालिका दोन टप्प्यात काम करणार आहे. पहिल्या टप्प्यात 352 कोटींच्या कामास मान्यता देण्यात आली होती. यानुसार केशवनगर येथे 12 एमएलडी क्षमतेचे तर मांजरी येथे उरुळी देवाची आणि फुरसुंगी या दोन गावांसाठी 93 एमएलडी क्षमतेचे शुद्धीकरण केंद्र उभारले जाणार होते. सुमारे 150 कोटींची ही कामे आहेत तर उर्वरित निधीतून या दोन गावांसह उर्वरित गावांमध्ये ट्रंकलाइन टाकण्यात येणार होत्या. दुसऱ्या टप्प्यात 9 गावांमध्ये त्यांच्या जोड लाइट टाकण्यात येणार होत्या. यासाठी सुमारे 150 कोटींचे काम होते. मात्र, ही दोन गावे वगळल्याने पालिकेने या दोन गावांतील सदर कामे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. तर, यासाठीचा निधी प्रशासन इतर 9 गावांमध्ये दुसऱ्या टप्प्यातील सांडपाणी वाहिन्यांच्या कामासाठी देणार आहे.
++++
इतर गावांना फायदा…
पालिकेत समाविष्ट 9 गावांना तब्बल 120 कोटींचा निधी उपलब्ध होणार असल्याने या गावांमधील सांडपाणी 100 टक्के संकलन होणार आहे. तसेच या गावांचे सांडपाणी महापालिकेकडून जायका योजनेत उभारण्यात येत असलेल्या सांडपाणी केंद्रात प्रक्रिया करून नदीत सोडले जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यात हे काम होणार होते, यासाठी पाच ते सहा वर्षांचा कालावधी गेला असता आता, ही दोन गावे वगळल्याने लगेच निधी उपलब्ध झाल्याने पुढील एक ते दोन वर्षातच हे काम होणार असल्याचे या गावांची सांडपाण्याची समस्या सुटणार आहे.