प्रभात वृत्तसेवा पुणे – चिंतनशील भाष्यकार, साहित्यिक तसेच राजकारणावर परखड भाष्य करणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे पु. ल. देशपांडे होय. पुलं हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक पटलावरील अविभाज्य घटक होय. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची छाया त्यांच्या आठवणींमधून, विचारांमधून की त्यांच्या प्रेरणादायी कार्यातून शोधायची हा महत्त्वाचा प्रश्न आहे. पुलंचे बहुआयामी विचार युवा पिढीला प्रेरक असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर यांनी केले. कोहिनूर ग्रुप प्रस्तुत आणि पु. ना. गाडगीळ आणि सन्स आयोजित ग्लोबल पुलोत्सवाच्या उद्घाटनावेळी ते आळेकर बोलत होते. ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस यांनी पुलंच्या ७५व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर रेखाटलेल्या व्यंगचित्राचे अनावरण करून पुलोत्सवाचे उद्घाटन झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी होते. पुलोत्सवाचे स्वागताध्यक्ष, कोहिनूर ग्रुपचे चेअरमन कृष्णकुमार गोयल, पु. ना. गाडगीळ ॲण्ड सन्सचे अजित गाडगीळ, महोत्सवाचे संयोजक वीरेंद्र चित्राव, सतीश जकातदार, कार्टुनिस्ट कंबाईनचे माजी अध्यक्ष, व्यंगचित्रकार चारुहास पंडित मंचावर होते. कार्टुनिस्ट कंबाईनतर्फे पुलंना मानवंदना देण्यासाठी बालगंधर्व कलादालनात पुलंच्या साहित्यवरील व्यंगचित्रांचे प्रदर्शन भरवले आहे. ते सकाळी १० ते रात्री नऊ या वेळेत सर्वांसाठी खुले आहे. पुलंच्या पंच्चाहत्तरीनिमित्त १९९४ मध्ये प्रदर्शित झालेला या सम हा लघुपट यावेळी दाखवण्यात आला. आळेकर यांनी पुलंच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. प्रा. मिलिंद जोशी, गोयल, पंडीत यांचेही भाषण झाले. चित्राव यांनी प्रास्ताविक केले, सूत्रसंचालन स्नेहल दामले यांनी केले.