नवी दिल्ली : पंजाबमध्ये कोरोनाच्या भीतीने अटारी वाघा सीमेवर होणारी रिट्रीट परेड अभ्यागतांसाठी स्थगित करण्यात आली. अमृतसरचे विभागीय आयुक्त शिवदुलर सिंग यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, या समारंभासाठी सुमारे 20 ते 25 हजार जण सहभागी होतात. मात्र गर्दी टाळण्याचे सरकारचे आदेश असल्याने या समारंभासाठी लोकांना उपस्थित राहता येणार नाही.
ध्वज खाली घेण्याचा हा उत्सव सीमा सुरक्षा दल आणि पाकिस्तान रेंजर्समध्ये 1959 पासून सुरू आहे. लोक मोठ्या संख्येने एकत्र येऊ नयेत, याची काळजी घेण्याचे आवाहन केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने केले आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. कोविद 19 ला आटोक्यात ठेवण्यासाठी गर्दी जमवणे टाळा, असे आवाहन जगभरातून करण्यात येत आहे.
भारतात कोरोनाचे 31 रुग्ण आहेत. त्यातील केरळचे तीन जण पूर्णत: ठणठणीत बरे झाले आहेत. चीनमधील वुहान शहरात उद्रेक झालेल्या या साथीचा प्रसार 60 देशांत झाला आहे. या विषाणूंचा उगम शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे चीन सरकारने म्हटले आहे.