भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता यावर आधारलेली त्यांची विचारसरणी भारतासाठी लाखमोलाची ठरली. कारण युगानुयुगे चालत आलेली जातीयता त्यांनी मोडून काढली. सध्या करोनामुळे भीमजयंती घरातच साजरी करावी अशी या लेखानिमित्त विनंती…
बाबासाहेबांचा जन्म मध्यप्रदेशातील इंदूरजवळील महू या लष्करी छावणीत 14 एप्रिल 1891 रोजी झाला. त्यांचे वडील रामजी मालोजी सपकाळ हे लष्करात सुभेदार होते. रत्नागिरी जिल्ह्यातील आंबडवे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव.
साताऱ्याच्या शाळेत बाबासाहेबांना शिकवण्यासाठी कृष्णाजी केशव आंबेडकर नावाचे शिक्षक होते. शाळेच्या दप्तरात नोंदवलेले आंबडवेकर हे आडनाव उच्चारताना त्यांना ते आडनीडे वाटत असे म्हणून माझे आंबेडकर हे नाव तू धारण कर, असे त्यांनी बाळभीमाला सुचविले. त्याला बाळभीमाने लगेच होकार दिला आणि बाबासाहेबांचे आडनाव आंबेडकर झाले तशी नोंद शाळेत झाली. त्यांचे प्राथमिक शिक्षण सातारा येथे झाले.
वडिलांच्या लष्करी पदामुळे इतर जातीच्या लोकांचा विरोध असूनही त्यांना माध्यमिक शिक्षणासाठी मुंबई येथे एल्फिस्टन हायस्कूलमध्ये प्रवेश मिळाला. जरी शाळेत प्रवेश मिळाला तरी भीमरावांना इतर अस्पृश्य मुलांबरोबर वेगळे बसावे लागे आणि शिक्षकांचे साहाय्य मिळत नसे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून ते वर्ष 1907 मध्ये मुंबई विद्यापीठाची मॅट्रिकची परीक्षा पास झाले. वर्ष 1906 मध्ये शालेय शिक्षण सुरू असतानाच दापोलीच्या 9 वर्षीय रमाबाई यांच्याबरोबर त्यांचा विवाह झाला. वर्ष 1912 मध्ये त्यांनी मुंबई विद्यापीठाची राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र विषय घेऊन पदवी संपादन केली आणि बडोदा संस्थानात नेकरीसाठी रूजू झाले.
पुढे बडोदा नरेशांकडून शिष्यवृत्ती घेऊन ते अमेरिकेला कोलंबिया विद्यापीठात उच्च शिक्षणासाठी गेले. बाबासाहेब आंबेडकरांचे उच्च शिक्षण मुंबई विद्यापीठ, कोलंबिया विद्यापीठ, बॉन विद्यापीठ, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि ग्रेज इन या संस्थांमधून झाले आहे. त्यांनी वर्ष 1912 मध्ये बी.ए., 1915 मध्ये दोन वेळा एम.ए., वर्ष 1917 मध्ये पी.एचडी., वर्ष 1921 मध्ये एम.एस्सी., वर्ष 1922 मध्ये बार-ऍट-लॉ, वर्ष 1923 मध्ये डी.एस्सी., वर्ष 1952 मध्ये एल्एल.डी., वर्ष 1953 मध्ये डी.लिट पदव्या मिळवल्या.
शिक्षण सुरू असतानाच त्यांना समाजासाठी काहीतरी करणे आवश्यक असल्याची जाणीव झाली होती. 1926 साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुंबई प्रांतिक विधानपरिषदेचे नियुक्त सदस्य बनले. वर्ष 1927 च्या सुमारास त्यांनी अस्पृश्यतेविरुद्ध जागृत चळवळ सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी पिण्याच्या पाण्यासाठी व देवळांमध्ये प्रवेशासाठी सार्वजनिक चळवळी व मोर्चे काढण्यास सुरुवात केली. वर्ष 1930 मध्ये काळाराम मंदिर प्रवेशासाठी सत्याग्रह केला.
वर्ष 1927 मध्ये 19 मार्च व 20 मार्च रोजी महाड येथे सत्याग्रह झाला. त्यामुळेच 20 मार्च हा दिवस “सामाजिक सबलीकरण दिन’ म्हणून भारतात साजरा केला जातो. महाड चवदार तळ्याला चार दारे होती म्हणून चौदारतळे असेही म्हणत. ही दोन मोठी आंदोलने अस्पृश्यते विरोधात त्यांनी उभारली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समाजाचे दीपस्तंभ म्हणून केलेले कार्य मोठे आहेच त्याबरोबर भारताची राज्यघटना, भारताच्या अर्थव्यवस्थेचा अभ्यास व रिझर्व्ह बॅंकेच्या स्थापनेतील सहभाग महत्त्वाचा आहे.
भारतात दोन वेळा धार्मिक क्रांती झाली. पहिल्यांदा 2 हजार 300 वर्षांपूर्वी कलिंगाच्या लढाईत झालेल्या मानवी संहारामुळे व्यथित झालेल्या सम्राट अशोकाने केलेला बौद्ध धर्माचा स्वीकार. त्यावेळी राजाश्रय मिळाल्याने बौद्ध धर्माचा प्रसार झपाट्याने झाला.
मात्र आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली कोणतीही राजसत्ता नसताना आपल्या अनुयायांना वैचारिक पातळीवर एकत्र करून नागपूरच्या दीक्षाभूमीवर धर्मांतर करून प्रचलित जातीव्यवस्थेस मोठा हादरा दिला. ज्यावेळी डॉ. आंबेडकरांनी धर्मांतर करायचे ठरविले त्यावेळी अनेक धर्मगुरू त्यांच्या निर्णयाकडे डोळे लावून बसले होते. परंतु बाबासाहेबांनी या भारताच्या भूमीत वाढलेल्या बौद्ध धर्माचा स्वीकार करून भारतीयत्वाची नाळ तोडली नाही. त्यांनी केलेले धर्मांतर हे बौद्ध धर्माचा पूर्ण अभ्यास करून केलेले होते. त्यांनी लिहिलेले “भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म’ हे पुस्तक वाचल्यावर त्यांनी केलेला सखोल अभ्यास चकित करणारा आहे. बौद्ध हा केवळ धर्म नसून ती आदर्श जीवनशैली आहे हे पुस्तक वाचल्यावर जाणवते.
डॉ. आंबेडकरांचे आणखी महत्त्वाचे कार्य म्हणजे त्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेचा केलेला अभ्यास व त्यावर लिहिलेला “द प्रॉब्लम ऑफ रुपी’ हा शोध निबंध. ब्रिटनमध्ये अर्थशास्त्राचे शिक्षण घेत असताना हा प्रबंध त्यांनी सादर केला होता. या निबंधामध्ये त्यांनी भारतातील रुपयाचे तत्कालीन पाश्चात्य राष्ट्रांबरोबर होणाऱ्या विनिमय दरात भारतीय अर्थव्यवस्थेचे शोषण होत असल्याचे दाखवून दिले व पाश्चात्य देशांची पूर्वेकडील चीन, भारत यांच्यावर लादलेला विनिमय दरामुळे चलनाच्या किमतीचे अवमूल्यन होत गेले हे प्रभावीपणे मांडले. पाश्चिमात्य राष्ट्रे त्यांच्याकडे असलेल्या सोन्याची किंमत व साठ्याप्रमाणे चलन वितरित करीत व भारतामधे सोन्याचे भांडवल नसल्याने रुपयाचे चलन अर्थव्यवस्थेत आणताना चांदी विकून सोने खरेदी करावे लागे व त्यावर चलनाचा दर ठरविला जाई. या निबंधामुळे मोठी खळबळ माजली.
इंग्रजांना डॉ. आंबेडकरांचे मार्गदर्शन घेऊन रिझर्व्ह बॅंकेची स्थापना करावी लागली. भारत हा ब्रिटनच्या अधिपत्याखालील देश असला तरी विनिमय दर त्यासाठी वेगळा होता. रुपयाचे मूल्य पौंड-डॉलर-पाश्चात्य राष्ट्रे यांच्या तुलनेत खूपच कमी होते. त्यामुळे भारताची आर्थिक पिळवणूक ब्रिटिश करीत होते हे वास्तव समोर आले. डॉ. बाबासाहेब हे कायद्याचे अभ्यासक व बॅरिस्टर होते. तसेच त्यांनी आपल्या अर्थशास्त्रीय अभ्यासाची चुणूक जगाला दाखविली. त्यांच्या “द प्रॉब्लम ऑफ रुपी’ या पुस्तकाचे वर्ष 1923 मध्ये प्रकाशन झाले. वर्ष 1942 ते 1946 या कालावधीत बाबासाहेब हे मजूर खात्याचे मंत्री होते. या खात्याव्यतिरिक्त जलसिंचन आणि ऊर्जाविभागाचा कार्यभारही त्यांच्याकडे होता. या तिन्ही महत्त्वाच्या विभागाच्या नियोजनाचा पाया डॉ. आंबेडकर यांच्या कार्यकाळात घातला गेला. त्यांनी प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसन समितीचे अध्यक्षपदही भूषविले होते.
बहुउद्देशीय धरण प्रकल्पाची संकल्पना प्रथम बाबासाहेबांनी मांडली. केंद्रीय जल आयोग व केंद्रीय विद्युत आयोग यांची स्थापना बाबासाहेब मंत्री असताना झाली. हिराकुड, दामोदर व सोन नद्यांवरील नदीखोरे प्रकल्पांची सुरुवात त्यांच्याच काळात झाली. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाल्यावर लगेचच देशाच्या राज्यकारभारासाठी घटना समिती नेमण्याचे ठरले. 30 ऑगस्ट 1947 रोजी मसुदा समितीच्या अध्यक्षपदी बाबासाहेबांची निवड झाली. त्यांनी त्याच दिवसापासून मसुदा समितीचे कामकाज सुरू केले. 26 नोव्हेंबर 1949 रोजी डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी भारताच्या संविधानाला मंजुरी दिली. भारतीय राज्यघटना, बौद्ध धर्मात धर्मांतर आणि अर्थशास्त्र या तीन गोष्टींचे जनक असलेले बाबासाहेब यांचे 6 डिसेंबर 1956 रोजी दिल्ली येथे महापरिनिर्वाण झाले.