कोपरगाव -बुधवारी निसर्ग चक्रीवादळाचा मोठा तडाखा कोपरगाव तालुक्याला बसला. माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी नुकसानीचा आढावा घेतला असून तातडीने पंचनामे करून या आपत्तीग्रस्तांना आर्थिक मदत द्यावी,अशी मागणी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री, महसूलमंत्री, पालकमंत्री, आपत्ती मदत व पुनर्वसनमंत्री यांच्याकडे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, करोनासारख्या महाभयंकर राष्ट्रीय आपत्तीचा सामना करत असताना निसर्ग चक्रीवादळाच्या संकटाने साऱ्यांना हादरवून टाकले. कोपरगाव तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात पाऊस व चक्रीवादळाने थैमान घातले. दरम्यान निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा कोपरगाव तालुका परिसराला बसला.
या नैसर्गिक आपत्तीने अनेकांची घरे उद्धवस्त केली. झाडे उन्मळून पडली. वीज पुरवठा खंडित असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. कर्ज काढून जीवापाड जपलेल्या शेतकऱ्यांच्या फळबागांबरोबरच अन्य पिकांचेही अतोनात नुकसान झाले. त्यामुळे शासनाने तात्काळ नुकसानीची पाहणी करून त्याचा अहवाल सादर करावा व नुकसानग्रस्तांना तातडीने भरपाई देऊन आर्थिक पॅकेज द्यावे, अशी मागणीही त्यांनी जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदारांना पाठवलेल्या निवेदनात केली.