कल्याण-डोंबिवली : स्वातंत्र्यदिनानिमित्त कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने (KDMC) सर्व कत्तलखाने आणि चिकन, मटण, मासे विक्रीच्या दुकानांना १४ ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून १५ ऑगस्टच्या मध्यरात्रीपर्यंत २४ तास बंद ठेवण्याचा आदेश जारी केला आहे. या निर्णयाला खाटीक संघटना, मांस विक्रेते आणि काही राजकीय पक्षांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. आज सकाळी खाटीक संघटनेचे कार्यकर्ते हातात कोंबड्या घेऊन KDMC कार्यालयाच्या गेटसमोर आंदोलनासाठी पोहोचले. यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला. पोलिसांनी सर्व आंदोलकांना ताब्यात घेतलं असून, कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. खाटीक संघटना आणि काही राजकीय कार्यकर्त्यांनी KDMC च्या या आदेशाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत १५ ऑगस्टला मांसाहारी जेवण तयार करून आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. यामुळे KDMC कार्यालय परिसरात राज्य राखीव पोलीस दलाची तुकडी तैनात करण्यात आली आहे. महापालिकेच्या १०० मीटर परिसरात वाहनांना प्रवेशबंदी घालण्यात आली असून, कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी कडक पावलं उचलली आहेत. आंदोलकांनी हातात कोंबड्या घेऊन निदर्शनं केल्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत त्यांना ताब्यात घेतलं. नेमकं प्रकरण काय? KDMC ने १९ डिसेंबर १९८८ च्या प्रशासकीय ठरावाच्या आधारे हा निर्णय घेतला आहे. उपायुक्त (परवाना) कांचन गायकवाड यांनी स्वाक्षरी केलेल्या नोटीशीनुसार, १५ ऑगस्ट रोजी सर्व कत्तलखाने आणि परवानाधारक दुकानांना बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हा आदेश महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, १९४९ अंतर्गत लागू असून, उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होईल, असा इशारा देण्यात आला आहे. KDMC आयुक्त अभिनव गोयल यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं की, हा नवा आदेश नसून, १९८८ पासून राष्ट्रीय आणि धार्मिक प्रसंगी हा ठराव लागू केला जातो. निर्णयाला तीव्र विरोध या निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी या बंदीला “वैयक्तिक स्वातंत्र्यावर हल्ला” संबोधत १५ ऑगस्टला मटण पार्टी आयोजित करण्याची घोषणा केली आहे. त्यांनी सोशल मीडियावर म्हटलं, “ज्या दिवशी आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, त्या दिवशी तुम्ही आमच्या खाण्याचं सवातंत्र्य हिरावून घेत आहात. लोक काय आणि कधी खावं हे ठरवण्याचा तुम्हाला अधिकार आहे का?” आदित्य ठाकरे यांनीही KDMC आयुक्तांच्या निलंबनाची मागणी केली आहे. ते म्हणाले, लोकांनी मांसाहार करावा की नाही हे ठरवण्याचा आयुक्तांना अधिकार आहे का? रस्ते आणि पूल दुरुस्तीऐवजी प्रशासन अन्नावर बंदी घालण्यात व्यग्र आहे. भिवंडीचे खासदार सुरेश म्हात्रे यांनीही या बंदीला विरोध करताना म्हटलं, अन्न हा वैयक्तिक आणि सांस्कृतिक बाब आहे, विशेषतः आगरी कोळी समाजासारख्या किनारी समुदायांसाठी. ही बंदी समजण्यापलीकडची आहे. मालेगावातही मांसविक्री बंदी कल्याण-डोंबिवलीपाठोपाठ मालेगाव महानगरपालिकेने १५, २० आणि २७ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिन आणि धार्मिक सणांच्या निमित्ताने कत्तलखाने आणि मांसविक्रीच्या दुकानांवर बंदी घातली आहे. या निर्णयामुळे मांसाहारी खवय्ये आणि व्यावसायिकांमध्ये नाराजी पसरली आहे. मांस विक्रेते आणि हॉटेल व्यावसायिकांनी या बंदीमुळे आर्थिक नुकसान होत असल्याचं सांगत आदेश मागे घेण्याची मागणी केली आहे.