पुणे जिल्हा | आंदोलकांनी टोकाची पावले उचलू नये

वाघोली (प्रतिनिधी) ; मराठा ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पेटला असतानाच वाघोली जवळ कटकेवाडी परिसरामध्ये मराठा आंदोलक व शंभूभक्त प्रसाद देठे या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (दि.१९) सकाळी घडली आहे. तरुणाच्या कुटुंबाची भेट घेत आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रामभाऊ दाभाडे, सकल मराठा समाज बांधव यांनी सांत्वन केले.
आरोग्य मंत्री सावंत यांनी संबंधित कुटुंबाला आधार देत सर्वांनी टोकाची पाऊल उचलू नये. आंदोलने न्यायिक मागण्या करून शासन दरबारी न्याय जरूर मागवा मात्र टोकाचे पाऊल उचलून कुटुंबाची हानी होणार नाही याची काळजी प्रत्येकाने घ्यावी.
समाजामध्ये चांगला संदेश जाईल, यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील कार्यकर्त्यांनी चांगले विचारांची देवाण घेऊन करावी. अशा घटना घडणार नाही याबाबतीत प्रबोधन करावे असे सावंत यांनी सांगितले.
देठे कुटुंबाच्या मुलांच्या शिक्षणाची तसेच मुलीच्या लग्नापर्यंत जबाबदारी सावंत यांनी घेत पालकत्व स्वीकारले आहे. यावेळी वाघोलीतून माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ दाभाडे यांना या कुटुंबासाठी शक्य तेवढी मदत व लक्ष देण्याबाबत देखील सूचना केल्या. या भेटीने सर्व वातावरण भावनिक झाले होते.





