मंचर : आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनल्याच्या पार्श्वभूमीवर किसान सभा, आंबेगाव तालुका समितीच्या वतीने मंगळवार, दि.७ रोजी पंचायत समिती घोडेगाव येथे महिलांनी हंड्यासह आंदोलन केले. पंचायत समिती प्रशासनाने विविध मागण्या सोडविण्याचे आश्वासन दिल्यामुळे पाच तासांनी आंदोलन मागे घेण्यात आले. प्रशासनाच्या वतीने प्रभारी तहसीलदार डॉ.सचिन वाघ,पंचायत समितीच्या सहाय्यक गटविकास अधिकारी वैशाली ईदे ,जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी महेश परदेशी,पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता विलाश भंडारी यांच्या सह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. किसान सभेच्या पदाधिकार्यांनी सांगितले की, आदिवासी भागामध्ये मोठ्या प्रमाणात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली असून, या प्रश्नाची तात्पुरती नव्हे तर कायमस्वरूपी सोडवणूक करावी, या प्रमुख मागणीसह विविध प्रश्न सोडवण्यासाठी हे आंदोलन करत आहे. आंदोलनाच्या अनुषंगाने पिण्याचे पाणी, रस्ते यांसारख्या मूलभूत प्रश्नांबाबत पंचायत समितीकडे मागण्या करण्यात आल्या आहेत. तसेच महावितरणकडे वीज बिल दुरुस्ती आणि मीटर रिडिंग वेळेवर घेण्यासंदर्भात प्रशासनाकडे मागण्यां करण्यात आल्या. आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागात सुरू असलेल्या विकासकामांबाबत ग्रामपंचायती व ग्रामसभेला विश्वासात घेतले जात नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. संबंधित कामांचे इस्टीमेट ग्रामपंचायत व ग्रामसभेला दाखवले जात नसल्याने पेसा कायद्याचे उल्लंघन होत असल्याची बाबही अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. पोखरी प्रादेशिक योजनेतून येणारे पाणी नियमित सुरू ठेवावे, तसेच ज्या गावांमध्ये पाणीटंचाई आहे तेथे तातडीने टँकर सुरू करावेत, या मागण्यांवरही भर देण्यात आला आहे. आदिवासी भागातील अनेक वाडी-वस्त्यांना अजूनही रस्त्यांची सुविधा नसून, पावसाळ्यात वाहतुकीला अडथळे निर्माण होतात. त्यामुळे अशा ठिकाणी पक्के रस्ते त्वरित करण्यात यावेत, किसान सभेचे नेते डॉ.अमोल वाघमारे,किसान सभेचे पुणे जिल्हा सहसचिव कॉ.अशोक पेकारी, उपाध्यक्ष कॉ.राजू घोडे, आंबेगाव तालुका अध्यक्ष कॉ.नंदा मोरमारे, तालुका सचिव कॉ.रामदास लोहकरे, सहसचिव कॉ.दत्ता गिरंगे, मच्छिंद्र वाघमारे, अविनाश गवारी, दीपक वालकोळी यांनी चर्चेमध्ये भाग घेतला.प्रशासनाने दिलेल्या आश्वासनामुळे आंदोलन मागे घेण्यात आल्याचे किसान सभेच्या वतीने जाहीर करण्यात आले.