मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची राज्यपालांच्या कोट्यातून विधान परिषदेवर नियुक्ती होणार की नाही, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असताना राज्य मंत्रिमंडळाने आज पुन्हा एकदा याबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना विनंती केली आहे. सह्याद्री अतिथीगृहात राज्य मंत्रीमंडळाची आज बैठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची येत्या 28 मे आधी राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून नियुक्ती करावी या प्रस्तावावर चर्चा झाली. राज्यपालांनी जे आक्षेप घेतले होते त्यावर ही चर्चा झाली.
याबाबत नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ठाकरे यांना राज्यपालांनी त्यांच्या कोट्यातून नियुक्त करावे, असा प्रस्ताव मंत्रिमंडळाने राज्यपालांना पाठवला होता. मात्र तांत्रिक कारणे देत राज्यपालांनी तो स्वीकारला नव्हता. आता राज्यपालांना आठवण करून देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
सध्या करोनाच्या संकटकाळात शासन-प्रशासन जोमाने संकटाचा मुकाबला करत आहे. करोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत राज्यातील अस्थिरता दूर होणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे मंत्रिमंडळाने आज महाराष्ट्र विधान परिषदेच्या एका रिक्त जागेवर विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची नियुक्ती करण्याच्या शिफारशींवर राज्यपालांनी तातडीने कार्यवाही करावी या विनंतीचा पुनरुच्चार केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्य करण्याबाबतच्या प्रस्तावावर पुन्हा चर्चा झाली. तसेच राज्यपलांना प्रस्तावाचे स्मरण करून दिले. या संदर्भात नवीन किंवा सुधारीत प्रस्ताव तयार करण्यात आलेला नाही. आधीच्याच प्रस्तावाचे स्मरण करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले.