नवी दिल्ली : वेगवेगळ्या कारणांमुळे जिथे जिथे हिंदूंची लोकसंख्या कमी झाली आहे तिथे समस्या निर्माण झाल्या आहेत, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केले आहे. याच कारणामुळे संघ हा सर्वव्यापी होऊन जागतिक कल्याणाबद्दल चर्चा करणार असल्याचे भागवत म्हणाले आहेत. हिंदू राष्ट्राच्या परम वैभवामुळे जगाचं कल्याण होईल, असा विश्वासही भागवत यांनी व्यक्त केला आहे.
करोना कालावधीमध्ये संघाच्या स्वयंसेवकांनी केलेली निःस्वार्थ सेवा म्हणजेच हिंदूत्व आहे, असे भागवत यांनी यावेळी हिंदूत्वाची व्याख्या सांगताना म्हटले. अशा कामांमध्ये सर्वांच्या कल्याणाची भावना असते. हिंदूंची लोकसंख्या कमी झालेल्या ठिकाणी समस्या निर्माण झाल्याच्या भागवत यांच्या वक्तव्यावरुन अनेकांनी त्यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली आहे.
मोहन भागवत यांनी राजस्थानमध्ये उदयपुरमधील विद्या निकेतन सेक्टर ४ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमामध्ये संघाचे संस्थापक डॉ. हेगडेवार यांच्या विचारांबद्दल भाष्य केले. हेगडेवार यांनी हिंदू सामाजाला एकत्र आणल्यास भारताच्या सर्व समस्यांवर समाधान मिळवता येऊ शकते असे म्हटल्याची आठवण भागवत यांनी करुन दिली.
आपण सर्वजण भारतमातेची लेकरं आहोत. हिंदू हे सनातन संस्कृतीला मानणारे आहेत. सनातन संस्कृतीच्या विचारसणीमधील संस्कार हे संपूर्ण विश्वाचा विचार करण्याची शिकवण देतात. हिंदूंच्या विचारसरणीमध्ये शांती आणि सत्य या दोन गोष्टींचा समावेश आहे. आपण हिंदू नाहीत अशा प्रकारची एक मोहीम देश आणि समाजाला कमकूवत बनवण्याच्या उद्देशाने राबवली जात असल्याची टीका भागवत यांनी केली आहे.
संघाचे संस्थापक डॉ. हेगडेवार यांनी भारतामधील विविधतेच्या तळाची एकतेचेचा भाव असल्याचं ओळखलं होतं, असेही भागवत यावेळी म्हणाले. अनेक पिढ्यांपासून या पुण्यवान प्रदेशामध्ये राहणाऱ्या पूर्वजांचे आपण वंशज असून सर्वचजण हिंदू आहोत. हाच हिंदुत्वाचा भाव आहे, असं सांगताना भागवत यांनी हेगडेवार यांच्या कार्याची माहितीही दिली.
हेगडेवार यांनी आपल्या खासगी स्वार्थाची आहुती देत भारतासाठी काम करण्याचा मार्ग स्वत:च्या इच्छेने निवडला. आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपण पुन्हा इतरांवर अवलंबून राहता कामा नये यासाठी काम करण्याची गरज हेगडेवार यांनी ओळखली. याच चिंतनामधून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा जन्म झाला, असे भागवत म्हणाले.
संघ हा जागतिक बंधूभाव जपण्याच्या भावनेने काम करतो. संघासाठी संपूर्ण विश्व हे समान आहे. संघाला लोकप्रियतेची हाव नाहीय. श्रेयवाद, लोकप्रियता संघाला नकोय. ८० च्या दहशकापर्यंत हिंदू शब्द हा सार्वजनिकपणे बोलायलाही टाळले जायचे. संघाने अशा परिस्थितीमध्ये प्रवाहाविरोधात जात काम केलं. सुरुवातीच्या काळामध्ये साधनांची कमतरता असतानाही संघ काम करत राहिला आणि आज संघ जगातील सर्वात मोठी संघटना म्हणून ओळखला जातो, असे भागवत यांनी संघाचा प्रवास सांगताना म्हटले.
भागवत यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहाद उल मुस्लिमीन म्हणजेच एमआयएमआयएमचे असीम वकार यांनी मोहन भागवत यांनी पूर्ण विचार करुन अशी वक्तव्य करावीत असे म्हटले आहे. ज्या ज्या ठिकाणी मुस्लीम अल्पसंख्यांक आहेत त्या ठिकाणी फार अत्याचार झाल्याचे पहायला मिळतं, मग ते गुजरात असो किंवा महाराष्ट्र. आपल्या शेजारी असणारे दोहा, कतार, दुबई असो किंवा ओमान असो कुठेच हिंदूंवर मुस्लीम अत्याचार करताना दिसत नाही. मात्र भारतात गुजरातबरोबरच अनेक ठिकाणी अत्याचाराची हद्द झाली आहे. त्यामुळे भागवत यांनी आपल्या वक्तव्याचा पुन्हा एकदा विचार केला पाहिजे.
तर दुसरीकडे समाजवादी पक्षाचे नेते राकेश सिन्हा यांनी संघ प्रमुखांनी संघाची पारंपारिक विचारसरणी लक्षात घेत हे वक्तव्य केल्याचे म्हटले आहे. भागवत यांना धार्मिक उन्माद निर्माण करायचा आहे. त्यांना लोकांचे लक्ष मुख्य मुद्द्यांवरुन दुसरीकडे वळवायचे आहे. के. सी. त्यागी यांनी ज्या ठिकाणी आता मुस्लीम लोकसंख्या अधिक आहे त्या लक्षद्वीप आणि काश्मीरमध्ये सध्या कोणतीही समस्या नसल्याचे म्हटले आहे.