नवी दिल्ली -कॉंग्रेसने शनिवारी संघटनात्मक पातळीवर महत्वाचा खांदेपालट करत विविध राज्यांचे प्रभारी बदलले. सर्वांत विशेष बाब म्हणजे, पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांना उत्तरप्रदेश प्रभारी या जबाबदारीतून मुक्त करण्यात आले. त्या बदलातून प्रियंका लोकसभेची निवडणूक लढवण्याची शक्यता असल्याचे संकेत मिळत आहेत.
विरोधी पक्षांच्या इंडिया या देशव्यापी आघाडीची दिल्लीत नुकतीच बैठक झाली. त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात उत्तरप्रदेशातील वाराणसी लोकसभा मतदारसंघात प्रबळ उमेदवार देण्याच्या प्रस्तावावर चर्चा झाली. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तर थेट प्रियंका यांना उमेदवारी देण्याचे सुचवल्याचे समजते. अर्थात, इंडियाच्या स्तरावर किंवा कॉंग्रेसची उमेदवार निवड होण्यास अद्याप काही अवधी जाणार आहे.
मागील निवडणुकीवेळीही प्रियंका वाराणसीतून लढणार असल्याची जोरदार चर्चा होती. मात्र, त्या स्वत: वाराणसी किंवा इतर कुठल्याच मतदारसंघातून निवडणूक लढल्या नाहीत. उत्तरप्रदेशातील रायबरेली आणि अमेठी लोकसभा मतदारसंघ प्रदीर्घ काळ कॉंग्रेसचे आणि विशेषत: गांधी परिवाराचे बालेकिल्ले ठरले. त्या दोन्हीपैकी एका मतदारसंघाची निवड प्रियंका निवडणूक लढवण्याचे ठरवल्यास करणार का, याविषयी उत्सुकता असेल. सध्या कॉंग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी लोकसभेत रायबरेलीचे प्रतिनिधित्व करत आहेत. मागील निवडणुकीत त्या पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना अमेठीत पराभव पत्करावा लागला होता.
स्टार प्रचारकाचाही पर्याय
प्रत्यक्ष निवडणूक न लढवल्यास प्रियंका स्टार प्रचारक म्हणून कॉंग्रेसला उपयुक्त ठरू शकतात. त्यामुळे पक्षाच्या स्टार प्रचारक बनून देशभरात झंझावाती प्रचार दौरे करण्याचा पर्याय त्यांच्यापुढे उपलब्ध असेल. प्रियंका यांच्याकडे नेमकी कुठली जबाबदारी सोपवली जाणार ते आगामी काळात स्पष्ट होईल.