मुंबई -दिल्लीचा आक्रमक फलंदाज पृथ्वी शॉ याला गेल्या काही महिन्यांपासून जे यश मिळत आहे, त्याचे प्रमुख कारण म्हणजे त्याच्या कारकिर्दीबाबत गंभीर झाला आहे. तो आता एक विद्यार्थी बनून चुकांतून मार्ग काढण्यासाठी प्रयत्नशील असल्यानेच त्याला हे यश मिळाल्याचे गावसकर म्हणाले.
क्रिकेट हा असा खेळ आहे, की तुम्ही प्रत्येक दिवशी विद्यार्थी असायला हवे. ज्या दिवशी तुम्ही स्वत:ला मास्टर समजायला लागाल त्या दिवसापासून तुमच्या अधोगतीला सुरुवात होते, असे मत विक्रमादित्य सुनील गावसकर यांनी आयपीएल सामन्याचे समालोचन करताना व्यक्त केले व एक प्रकारे शॉ याच्या बदललेल्या मानसिकतेचेही त्यांनी केलेले विश्लेषण होते.
पृथ्वीच्या खेळामध्ये आमूलाग्र बदल झाला आहे. त्याने एका विद्यार्थ्याच्या भूमिकेतून स्वत:ची कामगिरी उंचावली आहे. शार्दुल ठाकूरच्या एका षटकात 17 धावा काढताना अप्रतिम फलंदाजीचं दर्शन घडवले. त्याच्या बॅट व पॅड दरम्यानच्या गॅपमध्ये सुधारणा झाली आहे. पृथ्वीला माजी कसोटीपटू व प्रशिक्षक प्रवीण आमरे यांनी केलेले मार्गदर्शन खूपच लाभदायक ठरले. त्यांच्या सल्ल्यामुळेच पृथ्वी आज यशस्वी ठरत आहे, असेही गावसकर म्हणाले.
अत्यंत कमी वयात यश अपयशाचे चढ-उतार बघितलेल्या पृथ्वीवर भारतीय संघातून डच्चू मिळाला होता. परंतु परत प्रचंड मेहनत करून पृथ्वीने स्वत:त आश्वासक बदल घडवल्याचे बघायला मिळत आहे. याचीच दखल घेताना प्रत्येक खेळाडूने रोज एक विद्यार्थी भूमिकेतून मैदानावर उतरायला हवे, स्वत:ला मास्टर समजू नये, असा मोलाचा सल्ला गावसकरांनी नवोदित खेळाडूंना दिला आहे.
चेन्नईच्या 189 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीच्या शिखर धवन आणि पृथ्वी शॉ या सलामीवीरांनी दमदार कामगिरी नोंदवली. विजय हजारे ट्रॉफीतील आपला फॉर्म शॉने आयपीएलमध्येही कायम राखला. त्याने 27 चेडूत आपले अर्धशतक पूर्ण केले व धवनसह शतकी भागीदारी केली. या सामन्यात पृथ्वीने 38 चेंडूत 9 चौकार आणि 3 षटकारांसह 72 धावा फटकावल्या.
यशाचे श्रेय आमरे यांनाच – पृथ्वी
आयपीएल स्पर्धेतच नव्हे तर त्यापूर्वी झालेल्या विजय हजारे स्पर्धेत मला यश मिळाले, त्याचे श्रेय प्रशिक्षक प्रवीण आमरे यांनाच जाते, अशा शब्दांत पृथ्वी शॉ याने आपल्या गुरुला गुरुदक्षिणा दिली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतील सुमार कामगिरीनंतर पृथ्वी शॉला संघातून बाहेर काढण्यात आले होते. त्यानंतर पृथ्वीने फलंदाजीत सुधारणा करत विजय हजारे स्पर्धेत व त्यानंतर नुकत्याच सुरू झालेल्या आयपीएल स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे.
ऑस्ट्रेलियातून मायदेशी परतल्यावर त्याने थेट आमरे यांची भेट घेतली व त्यांच्या सराव सत्रात पृथ्वीने आपल्या चुका कशा दुरुस्त करता येतील, त्यासाठी आमरे यांचा सल्ला घेतला. पृथ्वीचे हेच प्रयत्न यशस्वी ठरले व त्यानंतर त्याने सातत्याने सरस कामगिरी केली आहे. त्यामुळेच त्याने आपल्याला जे यश मिळत आहे त्या मागे आमरे यांचे मार्गदर्शनच बहुमोल ठरले, असेही पृथ्वीने सांगितले.