मुंबई – कर्नाटकमधील प्रचारामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतदान करण्याआधी ‘जय बजरंगबली’ असा उच्चार करा, असे आवाहन जनतेला केले होते. यावरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.
‘सामना’तील ‘रोखठोक’ मधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
“पंतप्रधान मोदी यांनी कर्नाटकमधील प्रचारात बजरंगबलीला उतरवले. जय बजरंगबलीचे नाव घ्या आणि भाजपासाठी मतदानाचे बटन दाबा. नऊ वर्षे राज्य करूनही पंतप्रधान मोदी यांना निवडणुका जिंकण्यासाठी श्रीरामापासून बजरंगबलीपर्यंतचे सर्व हिंदू देव लागतात. लोकांना धर्मकारणात धुंद करून नशेबाज करायचे व निवडणुका जिंकायच्या. हिटलर आणि खोमेनीचे हे मिश्रण आहे. देशाला ते परवडणारं नाही. देश अशाने संपून जाईल व पुन्हा कुणाचा तरी गुलाम होईल”, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.
“हा धार्मिक प्रचार आहे. असा धार्मिक प्रचार केल्याबद्दल शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना सहा वर्षांसाठी मतदान करण्यास अपात्र ठरवले होते. तर निवडणुकीत शासकीय कर्मचाऱ्यांचा वापर केला म्हणून अलाहाबाद हायकोर्टाने इंदिरा गांधी यांची लोकसभेची निवडच रद्द केली होती. येथे पंतप्रधानांपासून त्यांचे संपूर्ण मंत्रिमंडळ सरकारी यंत्रणेचा वापर करून प्रचारात गुंतले आहेत. मात्र, कारवाई होत नाही. धर्माचे राजकारण आणि व्होट बँकेचे राजकारण घटना रोखू शकत नाही. देशाचा आजचा गोंधळ सावरण्यास घटना अपुरी पडत आहे,” अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.
“पंतप्रधान मोदींनी विधानसभा निवडणुकीत हिंदू-मुसलमानांचे कार्ड काढणे अपेक्षित होते. त्यानुसार त्यांनी ते काढले. खरं तर दिल्लीचे बाटला हाऊस एन्काऊंटर प्रकरण हा काही कर्नाटक निवडणुकीच्या प्रचाराचा विषय नव्हता, पण निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात मोदींनी बाटला हाऊस चकमक नव्याने सुरू केली. ते चालले नाही तेव्हा महाबली हनुमानास प्रचारात आणले”, असेही ते म्हणाले.