धक्कादायक ! मंदिरात आलेल्या तरुणीला भांग पाजून पुजाऱ्याकडून अत्याचार

ठाणे : ठाण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. घरगुती भांडण झाल्याने एक विवाहित तरुणी डायघर जवळील शीळ फाटा येथील मंदिरात मनःशांती मिळवण्यासाठी गेली असताना मंदिर सांभाळण्यासाठी उत्तर प्रदेश येथून आलेल्या तीन पुजाऱ्यांनी तिच्यावर आळीपाळीने बलात्कार करून तिची निर्घृणपणे हत्या केली.
काय घडले नेमके?
मंदिराचे मुख्य पुजारी बालक महाराज उत्तर प्रदेश येथे आपल्या गावी गेल्याने काही दिवस हे मंदिर सांभाळण्यासाठी श्यामसुंदर शर्मा, संतोष कुमार मिश्रा आणि राजकुमार पांडे या तीन पुजाऱ्यांना गावाहून बोलावून घेतले होते. घटनेच्या दिवशी म्हणजे ६ जुलै रोजी बेलापूर येथे राहणारी एक विवाहित महिला घरगुती ताणतणाव असल्याने सकाळी 10 वाजता गणेश घोळ मंदिरात मनःशांती मिळवण्यासाठी गेली होती. ही महिला दिवसभर त्याच मंदिरात बसल्याने येथील पुजाऱ्यांनी तिला दुपारचे जेवण दिले. त्यानंतर संध्याकाळचा चहा देताना त्यांनी चहामध्ये भांगेची गोळी मिसळून दिली. हा चहा पिल्याने त्या महिलेची शुद्ध हरपली आणि रात्रभर ही महिला या मंदिरातच राहिली.
यादरम्यान मंदिरातल्या तीन पुजाऱ्यांनी आळीपाळीने तिच्यावर बलात्कार केला. पहाटे शुद्ध आल्यानंतर या महिलेच्या ही गोष्ट लक्षात आल्यानंतर तिने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. आता आपले बिंग फुटणार हे पुजाऱ्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी तिची हत्या केली. त्यानंतर तिचा मृतदेह मंदिराच्या बाजूला असलेल्या जंगलात फेकून दिला.
अशाप्रकारे गुन्हा आला उघडकीस
दोन दिवसांनी मंदिरात गेलेल्या एका भक्ताला डोंगरावर जंगलात पडलेला तिचा मृतदेह दिसला. यासंदर्भात त्यांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर तत्काळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यानंतर पोलिसांनी मंदिराचे सीसीटीव्ही चेक केले असता त्यांना पुजाऱ्यांवर संशय आला. यानंतर पोलिसांनी पुजाऱ्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी आपला गुन्हा मान्य केला. श्यामसुंदर शर्मा, संतोष कुमार मिश्रा, राजकुमार पांडे अशी आरोपींची नावे आहेत. या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.





