आमिर खानच्या “लगान’ला यावर्षी आजच्याच दिवशी 20 वर्षे पूर्ण झाली. हा सिनेमा आमिर खानसाठी तर स्पेशल होताच. त्याचबरोबर तो भारतीय सिनेमासाठीही स्पेशल होता. दुष्काळाने गांजलेल्या शेतकऱ्यांनी कर माफी मिळवण्यासाठी ब्रिटिशांबरोबर क्रिकेट खेळण्याच्या या सिनेमातून आजही प्रेक्षकांच्या अंगावर रोमांच उभे राहतात.
या सिनेमाला 20 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आमिर खानने एक व्हर्च्युअल प्रेस कॉन्फरन्स घेतली. त्यामध्ये त्याला “लगान’चा रिमेक झाला तर भुवनचा रोल कोणी केला तर आवडेल असे विचारले गेले होते.
त्यामध्ये त्याच्यासमोर रणवर सिंह, रणबीर कपूर आणि विक्की कौशल असे पर्याय ठेवले गेले होते. हे सगळेच चांगले ऍक्टर आहेत. यांच्यापैकी कोणीही जरी “लगान’च्या रिमेकची तयारी दाखवली तर आपण आणि आशुतोष गोवारीकर “लगान’चे हक्क द्यायला तयार आहोत असे आमिरने सांगितले.
हे सिनेमा करायला आम्हाला जेवढे कष्ट घ्यायला लागले आहेत, तेवढे कष्ट घेण्याची तयारी दाखवल्यास आपली काहीही हरकत नसेल, असे तो म्हणाला. “लगान’ हा आशुतोष गोवारीकरने बनवलेला तिसरा सिनेमा होता. यापूर्वी त्याने “पहला नशा’ आणि “बाजी’चे डायरेक्शन केले होते.