पाटणा : बिहार विधानसभा निवडणूकीपूर्वीच जन सुराज पक्षाचे संस्थापक प्रशांत किशोर यांनी युती किंवा आघाडी न करण्याचे जाहीर केले होते. जन सुराज पक्ष सत्तेत आला किंवा आम्हाला स्पष्ट जनादेश मिळाला नाही तर आम्ही किंगमेकर बनणार नसल्याचे प्रशांत किशोर यांनी स्पष्ट करताना आमचा पक्ष कोणत्याही युती किंवा आघाडीमध्ये सहभागी होणार नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. याबरोबरीने बिहारमध्ये त्रिशंकू अवस्था निर्णाम झाल्यास आम्ही पुन्हा निवडणूकीला समोरे जाण्यासाठी तयार असल्याचे देखील त्यांनी सांगितले. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये जन सुराज पक्षाचे संस्थापक प्रशांत किशोर यांनी आपल्या भविष्यातील योजनांविषयी माहितीसह विविध विषयांवर भाष्य केले. ते म्हणाले की, आमचा पक्ष हा तत्वांशी कधीही तडजोड करणारा पक्ष नाही. तडजोड करण्यापेक्षा आम्ही लोकांसोबत काम करण्यावर प्राधान्य देणार असल्याचे देखील त्यांनी बोलताना स्पष्ट केले. ते म्हणाले, की, जर बिहारच्या लोकांना आता बदल अपेक्षित नसेल तरी आम्ही त्यांच्यासोबत राहू आणि पुढील पाच वर्षे त्यांच्यासाठीच काम करत राहू. त्यामुळे सरकारमध्ये सहभागी होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. जन सुराज पक्ष स्वत: सरकार बनवेल किंवा आम्ही विरोधात बसू. गरज पडल्यास पुन्हा निवडणूक घेतली तरी आम्ही त्यामध्ये देखील सहभागी होवू. आम्ही भाजपच्या विरोधात आहोत, आम्ही त्यांचा वैचारिक आधारावर विरोध करत असल्याचे देखील प्रशांत किशोर बोलताना म्हणाले. एवढी घाई कशासाठी ? येत्या 14 नोव्हेंबरला बिहार विधानसभेचे मतमोजणी होणार आहे. आम्ही जन सुराज निर्माण करण्यासाठी कठोर परिश्रम व प्रयत्न केले आहेत, त्यामुळेच अनेक बदल दिसून येत आहेत. तरी देखील आपण निकालांची वाट पाहुयात. निकाल आल्यानंतर सर्वात वाईट काय घडू शकते. आमचा पक्ष खूप जागा जिंकू शकणार नाही. नाही जिंकला तरी आम्ही पुढील पाच वर्षे काम करु. सत्तेत बसण्याची एवढी घाई कशासाठी. मी आताशी 48 वर्षांचा आहे, या कामासाठी मी अजून पाच वर्षे समर्पितपणाने काम करु शकतो, असे देखील प्रशांत किशोर यांनी स्पष्ट केले.