मुंबई : गिरणी कामगारांना घरे देण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम तयार करण्याचे तसेच, एकही पात्र गिरणी कामगार हक्काच्या घरापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील गिरणी कामगारांच्या घरांबाबत मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव असिमकुमार गुप्ता यांच्यासह म्हाडा, नगर विकास विभागाचे अधिकारी व कोल्हापूर जिल्ह्यातील गिरणी कामगारांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी आबिटकर म्हणाले, शासनाने गिरणी कामगारांच्या हक्काच्या घरासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. त्यामुळे अनेक गिरणी कामगारांना मुंबईत हक्काचे घर मिळाले आहे. उर्वरित गिरणी कामगारांनाही लवकर घरे मिळावीत, एकही गिरणी कामगार घरापासून वंचित राहू नये. सेंच्युरी, एनटीसी व इतर गिरण्यातील कामगारांनाही लवकर घरे मिळावित यासाठी कालबद्ध कार्यक्रम तयार करून काम गतीने करण्यावर भर देण्याचे निर्देशही दिले. ज्या गिरणी कामगारांनी शेलू (कर्जत) आणि कारव (ठाणे) येथील गृह प्रकल्पात संमती दिली आहे त्याची पुन्हा एकदा खात्री करावी. पात्र गिरणी कामगारांना न्याय मिळावा यासाठी संमतीपत्रांची पुन्हा पडताळणी करावी. संबंधित विभागांना प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याचे आणि गिरणी कामगारांना घरे मिळण्यासाठी प्रशासनाने तातडीने व समन्वयाने काम करण्याचे आदेशही त्यांनी दिले.