मागणी अभावी उत्पादनात घट : हजारो कामगारांचा रोजगार धोक्यात
बड्या कंपन्यांकडून वारंवार थांबविले जात आहे उत्पादन लघु आणि मध्यम उद्योग आर्थिक विवंचनेत
सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे ही परिस्थिती ओढवली आहे. एकीकडे सरकार राष्ट्रीयकृत बॅंकांना भरभरुन पैसा देत आहे, परंतु बॅंका लघु अणि मध्यम उद्योगांना अपेक्षेनुसार पतपुरवठा करत नाहीत. कित्येक उद्योजक सरकारच्या प्रकल्पांना देखील पुरवठा करतात आणि सेवा देतात. त्यांचे पेमेंट जरी सरकारने वेळेवर केले तरी मंदीच्या झळा कमी होतील. जीएसटीची अंमलबजावणी घाई-घाईने केल्याने अनेक वस्तू, उत्पादने आणि सेवा 18 ते 28 टक्के दराने औद्योगिक क्षेत्राला घ्याव्या लागल्याने नफा दोन टक्क्यांनी कमी झाला.
ऍड. आप्पासाहेब शिंदे, अध्यक्ष पिंपरी-चिंचवड चेंबर ऑफ इंडस्ट्रीज, कॉमर्स
शहरातील 25 टक्के उद्योगांकडे काम नाही. सरकारने वेळीच योग्य पाऊले उचलून कर आणि शुल्काचे दर कमी करावेत. रिझर्व्ह बॅंकेने व्याज दर कमी करुनही बॅंका व्याज दर कमी करत नाहीत. उद्योजकांच्या आर्थिक अडचणी आताच लक्षात घेतल्या नाहीत, तर भविष्यात परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते. वाहनांच्या नोंदणी शुल्कात वाढ जून 2020पर्यंत टाळण्यात आली आहे. तसेच मार्च, 2020 पर्यंत खरेदी केलेल्या बीएस-4 इंजिनच्या वाहनांना कोणतीही अडचण येणार नाही, हे चांगले निर्णय घेतले आहेत. परंतु यांचा परिणाम दिसण्यास वेळ लागेल. -प्रेमचंद मित्तल, अध्यक्ष, पिंपरी-चिंचवड एमएसएमई इंडस्ट्रीज असोसिएशन फोरम
उत्पादन कमी-कमी होत चालले असून बड्या कंपन्यांनी शटडाऊन केल्यानंतर लघु आणि मध्यम उद्योगांचे उत्पादन पूर्णपणे ठप्प होते. यामुळे आता लघु आणि मध्यम उद्योगांमध्ये काम करणाऱ्या अकुशल कामगारांवर नोकरी जाण्याची भिती निर्माण झाली आहे. अनेक उद्योगांनी कंत्राटावर काम करणाऱ्या अकुशल कामगारांना काढले आहे. तर बहुतेक उद्योजक अजूनही परिस्थिती सुधारण्याची वाट पाहत असून कामगारांना बसून पगार देत आहेत.
बेरोजगारीची टांगती तलवार
पिंपरी – उद्योगांच्या यंत्रांचा खडखडाट मंदावला असून उद्योगनगरी सध्या मोठ्या अडचणीत सापडली आहे. वाहन उत्पादन करणाऱ्या बड्या कंपन्या मागणी अभावी उत्पादनास ब्रेक लावत आहेत. परिणामी पिंपरी-चिंचवड, चाकण या परिसरातून दहा हजाराहून अधिक लहान व मोठे उद्योग मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
गेल्या चार महिन्यांपासून वाहन उद्योगात सुरू असलेल्या मंदीने आता उग्र रुप धारण करण्यास सुरुवात केली आहे. परिणामी शहराच्या अर्थव्यवस्थेवरही विपरीत परिणाम दिसू लागले आहेत.टाटा, महिंद्रा, फोर्स मोटर्स, वॉक्सवॅगन या कंपन्या पिंपरी-चिंचवड व चाकण परिसरात आहेत. शहरातील दहा हजाराहून अधिक लघु आणि मध्यम उद्योग या कंपन्यांवर अवलंबून आहेत.
टाटा मोटर्सने ऑगस्ट महिन्यात दोन वेळा उत्पादन थांबविले होते. तसेच येत्या 28 ते 31 ऑगस्ट दरम्यान पुन्हा एकदा ब्लॉक क्लोजर घेण्यात येत आहे.
वाहनांची विक्री होत नसल्याने कंपन्यांकडून वारंवार उत्पादन थांबविले जात असल्यामुळे लघु आणि मध्यम उद्योजकांकडे मोठ्या प्रमाणात स्टॉक पडून आहे.
25 टक्के उत्पादन घटले
स्थानिक उद्योजकांनी दिलेल्या माहितीनुसार सुमारे 25 टक्के उत्पादन घटले आहे. मध्यम उद्योगांसाठी काम करणाऱ्या कित्येक लघु उद्योजकांचे काम पूर्णपणे ठप्प झाले आहे. जिथे दोन शिफ्टमध्ये काम सुरू होते, तिथे आता एकाच शिफ्टमध्ये काम होत आहे. उद्योगांमध्ये कामगार बसून आहेत. दसरा-दिवाळी पूर्वी तीन ते चार महिने खूप जोरात काम सुरू असते, परंतु यावर्षी मात्र कित्येक ठिकाणी उत्पादन पूर्णपणे ठप्प झाले आहे. यामुळे सणांच्या आधी उद्योजक, कामगार त्रस्त झाले आहेत.