“करोना महामारी’च्या विरोधात लोकांमध्ये निर्माण झालेला अंध:कार दूर करण्यासाठी आणि त्यातून निर्माण झालेले नैराश्याचे वातावरण दूर करण्यासाठी रविवारी 5 एप्रिलला रात्री नऊ वाजता देशातील नागरिकांनी नऊ मिनिटांसाठी आपल्या घरातील विजेचे दिवे बंद करून, पणत्या किंवा मेणबत्त्या लावाव्यात,’ असे आवाहन पंतप्रधानांनी केले होते. त्यानुसार काल हा उप्रक्रम देशात पार पडला. पण या उपक्रमामुळे संपूर्ण देशभर सोशल मीडियावर गेले दोन-तीन दिवस जी उलटसुलट चर्चा झाली त्यातून लोकांचे मात्र अभुतपूर्व मनोरंजन झाले.
या उपक्रमाची खिल्ली उडवणाऱ्यांचे प्रमाण तुलनेने बरेच होते; पण मोदी समर्थकांनीही विविध शक्कल लढवून या उपक्रमाचे समर्थनही केले. त्यामुळे शाब्दिक आतषबाजीची जी राळ उडाली त्यातून बरेच मंथन झालेले पहायला मिळाले. एखाद्या विषयाचे समर्थन किंवा विरोध करण्यासाठी लोकांकडे जी अफाट कल्पनाशक्ती आहे त्याचेही प्रत्यंतर यातून अनुभवयाला मिळाले. पंतप्रधानांचे हे आवाहन प्रतिकात्मक स्वरूपाचे होते. त्यातून देशभरातील नागरिकांमध्ये “आपण सर्वजण एकसंध आहोत,’ ही भावना निर्माण व्हावी अशी त्यांची भावना होती. पण आधी टाळ्या आणि थाळ्या वाजवायला सांगितल्यानंतर, आता त्यांनी ही “दिवे लागण करण्याची’ केलेली सूचना लोकांना मनस्वी रूचली, असे म्हणता येणार नाही. किंबहुना अशी प्रतिकात्मक कृती केल्याने लोकांचे काही नुकसान होत नाही, हे जरी खरे असले तरी “करोना’मुळे निर्माण झालेले प्रश्न भीषण आहेत, त्याची उत्तरे कोण देणार? हा लोकांचा मूलभूत प्रश्न होता. आर्थिक संकटाचेही मोठे आव्हान यातून उभे राहिले आहे.
त्याहीपेक्षा या महामारीचा मुकाबला करण्यासाठी जी मूलभूत व्यवस्था या देशात निर्माण करण्याची गरज आहे, त्याचीच आज वानवा भासत असताना अशा दिवे लावणे वगैरे सारख्या प्रतिकात्मक कृतीने नेमके काय साध्य होणार? असा प्रश्न लोकांच्या मनात निर्माण होणे स्वाभाविक आहे. त्याला उत्तर देण्याऐवजी मोदी समर्थकांनी “मुठभर मीठ उचलून ब्रिटीशांना देशातून घालवून दिले, असा प्रचार जर खरा असेल, तर दिवे लागण करून लोकांच्या मनातील अंध:कार दूर पळवता येऊ शकणार नाही काय?’ असा खोचक सवाल, मोदी विरोधकांना केलेला पहायला मिळाला. हीच मालिका पुढे नुसते “चले-जाव’ म्हटल्यानंतर ब्रिटीश पळून गेले काय? वगैरे मुद्द्यांपर्यंतही ताणली गेली.
या साऱ्या पार्श्वभूमीवर ग्रीड फेल्युअरचाही विषय चर्चिला गेला. एकाच वेळी दिवे घालवणे आणि मग एकाच वेळी ते सुरू करण्याने विजेच्या ग्रीडवर लोड येऊ शकतो, ही तांत्रिक वास्तवता आहे. पण त्याचीही खिल्ली उडवली गेली आणि काल रात्री नऊ वाजून दहा मिनिटांनी “ती ग्रीड चालू आहे की गेली’ असे टोमणे मारणाऱ्या प्रतिक्रियाही सोशल मीडियावर झळकल्या. एकूणातच या साऱ्या उपक्रमात मनोरंजनाचा चांगलाच बहर आला होता. पंतप्रधानांचे आवाहन सरकारी यंत्रणा अत्यंत गांभीर्याने घेत असल्याचे प्रकारही या काळात अनुभवायला आले. केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयाने “पंतप्रधानांच्या आवाहनानुसार प्रत्येक विद्यार्थ्याने दिवे लावले पाहिजेत,’ अशी सूचना करणारे संदेश साऱ्या शाळांना पाठवले होते.
पालकांकडून ही माहिती गोळा करण्याची सूचनाही त्यात करण्यात आली होती. तसेच विद्यार्थी आणि पालकांना केंद्र सरकारचे “आरोग्य सेतू ऍप’ डाउनलोड करून घेण्याचीही सूचना करण्यात आली होती. त्यासाठी सीबीएसई बोर्डाकडून दिल्लीतील शाळांना एक्सेल शिटही पाठवण्यात आले होते. त्यात विद्यार्थ्यांच्या पालकांडून या सूचनेची अंमलबजावणी झाली की नाही, याची माहितीही मागवण्यात आली होती. हा प्रकार मात्र गंभीरच होता. त्यावर बराच आरडाओरडा झाल्यानंतर मुनष्यबळ विकास मंत्रालयाने त्यावर सारवासारव केली आहे. मोदींच्या या दिवे लावण्याच्या उपक्रमानंतर त्यांच्या समर्थकांकडून, “संपूर्ण देशात दीपप्रज्वलन झाल्यानंतर देशाचे “नासा’मार्फत अंतरिक्षातून घेण्यात आलेला फोटो म्हणून एक छायाचित्र टाकले जाईल,’ असे अनेकांनी आधीच नमूद करून ठेवले होते.
एवढेच नव्हे तर, मोदी समर्थकांना हा फोटो मिळण्यास अडचण होऊ नये म्हणून अनेकांनी हा फोटो आधीच आपल्या अकाउंटवरून शेअर करून ठेवला होता. इतकी थट्टा होऊनही भाजपचे महाराष्ट्रातील अतुल भातखळकर नावाच्या एका ज्येष्ठ नेत्याने अंतरिक्षातून काढण्यात आलेल्या भारतातील दिवे लावणीच्या उपक्रमाचा फोटो म्हणून हा फोटो शेअर केलाच. त्यातून त्यांची यथेच्छ खिल्ली उडवण्यात आल्यानंतर त्यांनी हा फोटो डिलीट केला. पण या साऱ्या प्रकारातून एक महत्त्वाची बाब पुन्हा एकदा निदर्शनाला आली, ती ही की, आता सोशल मीडियातून प्रसारित होणाऱ्या संदेशातून लोकांची दिशाभूल होण्याचे प्रमाण कमी होण्याऐवजी ते वाढतच चालले आहे. शरद पवारांनी आज म्हटले आहे की, सोशल मीडियात प्रसारित होणाऱ्या पाच संदेशापैकी चार संदेश खोटे आणि दिशाभूल करणारे असतात.
पण शहाण्या माणसाचीही यातून पद्धतशीर दिशाभूल केली जात आहे. देशात निर्माण झालेली “करोना’ची स्थिती आणि त्यावर सरकारी पातळीवरून योजले गेलेले नेमके उपाय यावर आता खरे म्हणजे एक “श्वेत पत्रिका’ काढण्याची गरज निर्माण झाली आहे. आजही चाचणी किट्स अभावी अनेक रुग्णांच्या चाचण्या न करताच त्यांना परत पाठवले जात असल्याचे सांगितले जात आहे. करोनाग्रस्तांवर उपचार करण्यासाठी जे वैद्यकीय कर्मचारी झुंज देत आहेत त्यांच्या सुरक्षेच्या उपायांच्या बाबतीतही आपण कमी पडत आहोत. हे जर देशाचे वास्तव असेल तर प्रतिकात्मक कृतीने त्याचा मुकाबला होणार आहे काय, या प्रश्नाचेही उत्तर मिळायला हवे.
आजच मुंबईतील वोकहार्ड रुग्णालयातील 26 परिचारीका आणि 3 डॉक्टर्स करोनाग्रस्त झाल्याचे आढळून आल्यानंतर हे हॉस्पिटलच बंद करावे लागले आहे. अशा प्रसंगांना देश सामोरा जात असताना पंतप्रधानांनी त्या अनुषंगाने करण्यात आलेल्या उपायांवर काही भाष्य करणे अपेक्षित आहे. पण ते त्यावर काहीच बोलताना दिसत नाहीत. “करोना’मुळे जे अन्यही प्रश्न निर्माण झाले आहेत त्यावरील उपाययोजनांचा भावी आराखडा त्यांनी लोकांपुढे ठेवणे अपेक्षित आहे, त्यातले काहीही न करता लोकांना केवळ प्रतिकात्मक उपाययोजनांच्या नादी लावण्याला लोकांचा तीव्र आक्षेप आहे आणि तो बऱ्याच अंशी खराही आहे. पंतप्रधान आता लवकरच वास्तवाचे भान ठेवून आपल्याला काही मागर्दशन करतील, अशी आशा आपण बाळगूया!