नागपूर, ता. 6 – देशाला समर्थ करण्यासाठी व त्याचा उत्कर्ष साधण्यासाठी जनतेने ऐक्याची कास धरली पाहिजे, असे आवाहन पंतप्रधान पं. नेहरू यांनी येथे बोलताना केले. पंतप्रधान पं. नेहरू आज येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करताना बोलत होते.
पंडितजी म्हणाले, शिवाजी महाराज हे भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे प्रतीक आहेत. त्यांनी ऐक्याचा महान संदेश दिला आहे. येथील शिवाजी फाइन आर्टस् लिओ वर्क्सच्या 64 फूट उंचीच्या इमारतीवर बसविण्यात आलेला शिवाजी महाराजांचा पुतळा कॉंक्रीटचा बनवला आहे.
पंडितजी म्हणाले, शिवाजी महाराज सर्व भारताचे स्वातंत्र्यासाठी झगडले. देशाच्या इतिहासातील शिवाजी महाराज ही महान व्यक्ती आहे. त्यांच्या उदयानंतर भारतात नवे युग सुरू झाले. 10-12 वर्षांपूर्वी भारत स्वतंत्र झाला तेव्हाच त्यांनी सुरू केलेल्या स्वातंत्र्य लढ्याची पूर्ती झाली. भारताच्या या महान व्यक्तिमत्त्वाच्या ऐक्याचा संदेश सध्या फार महत्त्वाचा आहे.
चंद्राच्या पृष्ठवंशाचा नकाशा
मॉस्को – चंद्रावरील पृष्ठवंशाचा चढउतार दाखविणारा व 15 लाखास 1 या प्रमाणात एक नकाशा लेनिनगार्डचे भूवैज्ञानिक अलेक्झांडर खॅबकॉव्ह यांनी तयार केला आहे असे टॉस वृत्त संस्थेने जाहीर केले आहे. पुलोव्हा आणि ऍबस्ट्रूमन येथील वेधशाळेतून अनेक वर्षे निरीक्षण करून हा नकाशा बनविण्यात आला आहे. चंद्रावर जाणाऱ्या अंतरिक्षयानाला अधिक तपशील असलेले नकाशे लागतील असे खॅबकॉव्ह यांनी वार्ताहरांना सांगितले.
मतदान पात्रतेचीवयोमर्यादा कमी केली
कोलंबो – सीलोन पार्लमेंटमधील सरकार पक्षाने मतदान पात्रतेची वयोमर्यादा 21 वरून 18 वर आणण्याची योजना मंजूर केली. या योजनेचा समावेश गेल्या महिन्यात पार्लमेंट पुढे मांडलेल्या बिलातच करण्यात आला होता. पण मतदान-पात्रतेची वयोमर्यादा कमी करण्याने मतदानप्रकरणी विद्यार्थ्यांमध्ये बेशिस्तपणा माजेल अशी भीती काही जणांनी व्यक्त केली होती, म्हणून फेरविचार झाला. त्यानुसार वयोमर्यादा कमी केली.