आ. पृथ्वीराज चव्हाण यांचा मालखेड येथे विरोधकांवर हल्लाबोल
कराड – पैशाच्या जोरावर राजकीय प्रतिष्ठा मिळवण्याचा विरोधकांचा प्रयत्न दोनवेळा जनतेने हाणून पाडला. तिसऱ्यावेळी पुन्हा ते तुमच्यासमोर आले आहेत. पैशाच्या पाश्वी ताकदीवर आपला पैसा लपवण्यासाठी त्यांनी जातीयवादी पक्षांचा आधार घेतला आहे. त्यांना जनतेच्या सुख व दुःखाचे काहीही घेणेदेणे नाही. विरोधकांना केवळ आपल्या संस्था मोठ्या करण्यासाठी राजकीय सत्ता हवी आहे, असे मत माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.
मालखेड, रेठरे खुर्द, खुबी येथे प्रचारार्थ ते बोलत होते. ते म्हणाले, गेल्या दोन महिन्यापूर्वीच लोकसभेची निवडणूक झाली. ती लगेच सातारा जिल्ह्यातील जनतेवर का लादली, याचे उत्तर आम्हाला देणे कठीण आहे. पोटनिवडणुकीचा 22 कोटींचा अकारण बोजा पडणार आहे. देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. या सरकारकडून एका बाजूला जातीय ध्रुवीकरण व दुसऱ्या बाजूला आर्थिक मंदी आहे. त्यामुळे राज्यात परिवर्तन होणे गरजेचे आहे.
अविनाश मोहिते म्हणाले, 2013 पूर्वीची व सध्याची कराडची प्रतिमा यामध्ये जमीन-आस्मानचा फरक आहे. विरोधकांनी सभासदांच्या मालकीच्या संस्थांमध्ये नोकऱ्या दिल्या. त्यांनी यात काय नवल केले, असे सांगून तुमच्या कितीही संस्था असल्या, तरी राजकीय प्रतिष्ठा मिळणार नाही. यावेळी पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.