पारगाव शिंगवे – करोनामुळे गैरसमजुतीून सुरुवातीला पोल्ट्री व्यावसाय अडचणीत आला होता. आता पुन्हा चिकनला मोठ्या प्रमाणात मागणी वाढत असून व्यावसायिकांनी पुन्हा एकदा पोल्ट्रीकडे लक्ष दिले आहे. उन्हाळ्यात तापमानात मोठी वाढ झाल्याने पोल्ट्री व्यवसायिकांना एक एक कोंबडी (पिल्ले) जगवण्यासाठी मोठ्या प्रमाणात कसरत करावी लागत आहे. शेती व्यवसायाला पूरक म्हणून पोल्ट्री व्यवसाय करण्यात येतो.
तालुक्यात पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या सातगाव पठार, लोणी, धामणी आदी भागात पोल्ट्री व्यवसाय करण्यात येतो. सध्या उन्हाळा सुरू असल्याने तापमान वाढलेले आहे. या उष्णतेचा परिणाम पोल्ट्री व्यवसायावर होत आहे.
उष्णतेपासून कोंबड्यांना वाचवणे, औषधे आणि वातावरण थंड ठेवण्यासाठी पोल्ट्री शेडच्या पत्र्यांवर उसाचे पाचाट ठेवून त्यावर दिवसातून तीन ते चार वेळा पाणी मारावे लागत आहे. यामुळे पोल्ट्रीच्या शेडमधील वातावरण थंड राहते, असे पोल्ट्री व्यवसायिक संतोष टाके यांनी सांगितले.