सातारा -येथील हिरवाई प्रकल्पाच्यावतीने दरवर्षी राबविण्यात येणाऱ्या “वृक्षारोपण महोत्सव’ यावर्षी आगळ्यावेगळ्या पद्धतीने होत आहे. लॉकडाऊनच्या काळातही लोकांमध्ये निसर्ग आणि पर्यावरणाविषयी आस्था निर्माण व्हावी म्हणून वृक्षसंवर्धनाची जाणीव मनामनांत रुजविण्यासाठी “हिरवाई प्रश्नावली मंजुषा’ हा विद्यार्थ्यांसाठी व कुटुंबासाठी वेगवेगळा असा ऑनलाइन उपक्रम राबविला असून त्याला विद्यार्थी व पालकांसह लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.
या वर्षी जागतिक पर्यावरण दिन आणि वटपौर्णिमा एकाच दिवशी आली आहे. वटपौर्णिमेच्या निमित्ताने “हिरवाई’कडून देण्यासाठी 50 वडाची रोपे तयार आहेत. प्रत्येक रोप तीन वर्षे कुंडीमध्ये लावून जतन केलेले व 4 ते 5 फूट उंचीचे आहे. वृक्ष जतन करण्याची शंभर टक्के खात्री देणाऱ्या व्यक्तीला किंवा संस्थेला “हिरवाई’कडून हे वृक्ष दान केले जाईल, अशी माहिती प्रा. संध्या चौगुले यांनी पर्यावरण दिनानिमित्त दिली.
करोनाच्या संकटामुळे एकत्र आलेल्या आपल्या कुटुंबाच्या माध्यमातून झाडांशी नाते जोडण्याच्या या संकल्पनेतून 15 मेपासून हिरवाई वृक्षारोपण प्रश्नावलीचा ऑनलाइन उपक्रम राबविला. या उपक्रमात सुमारे दोन हजारांहून अधिक लोकांनी या हंगामात वृक्षारोपण करुन त्याचे संगोपन करण्याचे मत व्यक्त केले आहे. यामध्ये 1437 विद्यार्थीवर्गाचा समावेश आहे.
पुसेगावच्या श्री सेवागिरी विद्यालयाने व ग्रामीण भागातील इतर शाळांतील मुलांनी अंगणात, परड्यात, बांधावर, शेतात अनेक झाडे लावली असल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षणाधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या वतीने जिल्ह्यातील सर्व शाळांना उपक्रमात सामावून घेतले आहे. करोनाच्या जागतिक संकटामुळे आपल्याला पुन्हा एकदा निसर्गाला जपण्याची जाणीव या उपक्रमातील सहभागींच्या मनात जागवली आहे.