पुणे – शहराला वाढीव पाणी मिळावे, यासाठी महापालिकेने पाटबंधारे विभागाकडे सादर केलेल्या लोकसंख्येच्या आकडेवारीत तफावत असल्याचे समोर आले आहे.
त्यामुळे 2031 पर्यंत पालिकेस 14.50 टीएमसी पाणी द्यायचे झाल्यास आधी नगरविकास विभागाकडून महापालिकेच्या हद्दीतील लोकसंख्या प्रमाणित करून घ्यावी, अशी मागणी पाटबंधारे विभागाने शासनाकडे वाढीव पाणी कोट्यासाठी ठेवलेल्या प्रस्तावात करण्यात आली आहे.
पालिकेने सादर केलेल्या लोकसंख्येच्या आकडेवारीतही दुबार लोकसंख्या गृहीत धरल्याचा आक्षेप पाटबंधारे विभागाने नोंदवला आहे. महापालिकेस 2031 च्या लोकसंख्येच्या निकषावर 2021 मध्ये साडेअकरा टीएमसी, तर 2031 च्या लोकसंख्येच्या निकषानुसार 14.50 टीएमसी पाणी देण्याचा प्रस्ताव पाटबंधारे विभागाने जूनमध्ये राज्यशासनास पाठवला आहे.
या प्रस्तावात लोकसंख्येच्या आकडेवारीत तफावत असल्याचे म्हटले आहे. निश्चित आकडेवारी नगरविकास विभागानेच प्रमाणित करून द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे.