गरीब माणूस केंद्रबिंदू मानून काम करावे – पालकमंत्री दत्तात्रय भरणे

सोलापूर :- शासनाचा एक घटक म्हणून काम करत असताना सर्वसामान्य गरीब माणूस केंद्र बिंदू ठेवून काम केलेले आहे. प्रत्येक गरीब लाभार्थ्यांपर्यंत शासकीय योजना पोहोचवण्याचा कसोशीने प्रयत्न करीत आलेलो आहे व पुढे ही काम करत राहणार आहे. तरी इतरांनीही गरीब माणूस केंद्रबिंदू मानून काम करावे व त्यांचे प्रश्न मार्गी लावावेत, असे आवाहन राज्याचे सार्वजनिक बांधकाम, वने, मृद व जलसंधारण, सामान्य प्रशासन राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.
लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नागरी विकास योजनेअंतर्गत प्रभाग क्रमांक पाच येथील बाळे हद्दवाढ परिसरातील जय मल्हार नगर, पांढरे वस्ती व लाडव वस्ती येथील रस्ता डांबरीकरण व कॉंक्रिटीकरण पालकमंत्री भरणे यांच्या हस्ते झाले, त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, नगरसेवक आनंद चंदनशिवे, गणेश पुजारी, संतोष पवार, जुबेर बागवानसह अन्य मान्यवर व नागरिक उपस्थित होते.
पालकमंत्री भरणे पूढे म्हणाले की, सर्वसामान्य गरीब नागरिकांचे लहान लहान प्रश्न असतात ते प्राधान्याने सोडवण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. बाळे हद्दवाढ परिसराच्या विकासासाठी निधी उपलब्ध केला जाईल. आता जी कामे सुरू आहेत ती खूप चांगली असून पुढे ही अशीच विविध विकासात्मक कामे सुरूच राहतील असेही त्यांनी सांगितले.
प्रारंभी अण्णाभाऊ साठे नागरी विकास योजनेअंतर्गत नगरसेवक आनंद चंदनशिवे यांच्या प्रयत्नातून प्रभाग क्रमांक पाच येथील बाळे हद्दवाढ परिसरातील जय मल्हार, नगर पांढरे वस्ती व लाड वस्ती येथील रस्ते काँक्रीटीकरण कामाचे भूमिपूजन पालकमंत्री भरणे यांच्या हस्ते करण्यात आले.





