नगर -शहरातील रामवाडी परिसरातील रस्त्याची दुरावस्था झाली आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीकरण्यासाठी नागरिकांनी मनपाचे उंबरे झिजवले आहे. मात्र, तरीही प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. या रस्त्याची लवकरात लवकर दुरुस्ती करावी यासाठी आमदार संग्राम जगातप यांच्या मार्गदर्शनाखाली आणि रामवाडी मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष पप्पू पाटील यांच्या नेतृत्वाखाली आयुक्तांना निवेदन देण्यात आले आहे. अन्यथा आंदोलन करण्यात येइल असे निवेदनात म्हटले आहे.
रामवाडी परिसरात गरिब कष्टकरी नागरिक राहतात, या नागरिकांचा वापर फक्त मतदार म्हणून किती दिवस करणार? पॅचिंग च्या गोंडस नावाखाली कोण मलिदा खातोय हे सर्व नगरकर जाणतात. आमच्या संयमाचा बांध ढळू देऊ नका अन्यथा या शहराच्या इतिहासात झालं नसेल असे आंदोलन आपल्या कार्यकाळात झाल्याची नामुष्की आपल्यावर ओढावी लागेल.
रामवाडी परिसरातील रस्ता खराब झाला असून या ठिकाणी विद्यार्थ्याची मोठी वर्दळ असते, तसेच या परिसरात दुचाकी वाहनांची मोठी बाजारपेठ असल्याने वारंवार येथे येणाऱ्यांची संख्या मोठी आहे मात्र, मनपाला जाग येत नसल्याने आता आंदोलन करण्याशीवाय पर्यय नसल्याचे पाटील यांनी म्हंटले आहे. शहरातील रस्ते दुरुस्त करावेत असे आदेश राज्य शासानाने दिले आहे.