प्रभात वृत्तसेवा शिरूर – शिरूर तालुक्यातील जांबूत – शरदवाडी परिसरात कोर्टात जमीन वाटपाचा विषय प्रलंबित असतानाच सख्ख्या भावाने दोन भावांच्या शेतातील तब्बल १३०० डाळिंब झाडे तोडून टाकल्याची अमानुष घटना मध्यरात्रीच्या अंधारात घडली आहे. कष्टाचे पीक फुलत असताना घडलेल्या या निर्दयी प्रकारामुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. शेतकरी शहाजी निवृत्ती थोरात आणि दिलीप निवृत्ती थोरात या दोन भावांनी शिरूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांनी आरोप केला आहे की, त्यांचा सक्का भाऊ बाळू निवृत्ती थोरात आणि इतरांनी रात्रीच्या वेळी त्यांच्या शेतातील झाडांची तोडफोड केली.शहाजी व दिलीप थोरात यांनी चार वर्षांपूर्वी सुमारे तीन एकर क्षेत्रावर भगवा जातीची १३०० डाळिंबाची रोपे लावली होती. लाखो रुपयांचा खर्च करून त्यांनी ही झाडे वाढवली होती. सध्या या पिकाला मोठ्या प्रमाणात फळधारणा झाली होती आणि पुढील दोन महिन्यांत काढणी अपेक्षित होती. परंतु, शुक्रवारी मध्यरात्री शेतात घुसून सर्व १३०० झाडे मुळासकट तोडल्याची धक्कादायक माहिती थोरात यांनी दिली. लागवड, सिंचन, खतांची गुंतवणूक, मजूर खर्च आणि निगा यासाठी आतापर्यंत केलेले मोठे भांडवल आणि अपेक्षित उत्पन्नाचा विचार करता अंदाजे ४० ते ४५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे शहाजी आणि दिलीप थोरात यांनी सांगितले. ज्यावेळी शेतमालाला योग्य भाव मिळत नाहीये, अशा परिस्थितीत एवढे मोठे नुकसान झाल्याने त्यांच्या आर्थिक स्थितीवर गंभीर परिणाम झाला आहे. शेतजमिनी वाटपाचा विषय कोर्टात प्रलंबित असतानाही झाडे तोडून टाकणे हा न्याय व कायद्याचा अवमान ठरत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.ही घटना केवळ दोन शेतकऱ्यांचे नुकसान नाही, तर संपूर्ण शेतकरी समाजाच्या मनात भीती निर्माण करणारी आहे. जांबूत – शरदवाडी परिसरातील शेतकरी व नातेवाईक संतप्त झाले असून, दोषींवर त्वरित व कडक कारवाई करण्यात यावी, तसेच शेतकऱ्यांचे नुकसान भरून काढण्यासाठी मदत द्यावी, अशी मागणी जिल्हा प्रशासन, पोलीस व महसूल विभागाकडे करण्यात आली आहे. “आमचे चार वर्षांचे श्रम एका रात्रीत संपले…” चार वर्षे आम्ही या झाडांना लेकरांसारखी वाढवले, आत्ताच फळधारणा झाली होती. तीन महिन्यात पीक हातात येणार होते. पण रात्री येऊन भावानेच निर्दयीपणे १३०० झाडे तोडली. आमचे चार वर्षांचे स्वप्न एका क्षणात संपले. असा तीव्र भावनांचा उद्रेक डाळींब मालक शहाजी व दिलीप थोरात यांनी व्यक्त केला.