Sachin Pilot : राजस्थानमधील भाजप सरकार पराभवाच्या भीतीने घाबरले असून, त्यामुळेच राज्यातील पंचायत निवडणुका जाणीवपूर्वक लांबणीवर टाकल्या जात आहेत, असा जोरदार आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सचिन पायलट (Sachin Pilot) यांनी मंगळवारी केला. उच्च न्यायालयाने १५ एप्रिलपर्यंतची मुदत देऊनही सरकार कोणत्या ना कोणत्या कारणाने निवडणुका पुढे ढकलण्याचे प्रयत्न करत आहे, असेही त्यांनी यावेळी नमूद केले. पत्रकारांशी संवाद साधताना पायलट (Sachin Pilot) म्हणाले की, सत्ताधारी पक्षाला जनमताची धास्ती वाटत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लोकशाहीचा आधार आहेत, परंतु सरकारला ना न्यायालयाच्या निर्देशांची चिंता आहे ना जनतेच्या प्रश्नांची. Sachin Pilot निवडणुका लांबल्यामुळे ग्रामीण भागातील विकासकामे ठप्प झाली असून ‘मनरेगा’अंतर्गत मिळणारा रोजगारही बंद पडला आहे, ज्यामुळे सर्वसामान्यांची मोठी गैरसोय होत आहे. महिला आरक्षणाबाबत बोलताना पायलट (Sachin Pilot) यांनी स्पष्ट केले की, काँग्रेस नेहमीच महिला सक्षमीकरणासाठी कटिबद्ध राहिली आहे. सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली यूपीए सरकारनेच यासाठी पुढाकार घेतला होता. या निर्णयाला आमचा पाठिंबा आहे, मात्र केंद्र सरकारने यासाठी योग्य प्रक्रियेचे पालन करणे आवश्यक आहे. यावेळी त्यांनी राजस्थानमधील ढासळत्या कायदा व सुव्यवस्थेवरूनही राज्य सरकारवर निशाणा साधला. भाजप सरकारचे कायदा आणि सुव्यवस्था किंवा जनकल्याण यांपैकी कशावरही नियंत्रण राहिलेले नाही, अशी टीका त्यांनी केली.