प्रभात वृत्तसेवा लोणी काळभोर – फेसबुक, ट्विटर, व्हॉटस ॲप व इन्स्टाग्राम सारख्या सोशल मीडियाचा जोरदारपणे वापर करून २०१४ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपचे सरकार केंद्रात सत्तारूढ झाल्यापासून दिल्लीपासून गल्ली पर्यंतच्या सर्वच राजकीय नेत्यांना सोशल मीडियाचे महत्त्व समजले. आगामी काळात राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका होणार आहेत. निवडणुकीपूर्वीच सोशल मीडियाचा प्रभाव दिसून येत आहे. गुुलाबी थंडीत पूर्व हवेलीत झेडपी आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी, रणनितीचे रण तापले आहे.निवडणुकांसाठी पूर्वीच्या काळी प्रचाराची माध्यमे वेगळी होती. रंतु प्रचाराची ही परंपरागत पद्धत सोशल मीडियामुळे गेल्या काही वर्षांत बदलली आहे. काही वर्षांत देशात मोबाइलची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे. बहुतेक नागरिकांकडे अँड्राईड मोबाइल आहेत. अँड्राइड मोबाइल वापरणारे ९० टक्के मतदार फेसबुक, ट्विटर, व्हॉटस ॲप, इन्स्टाग्राम आदी सोशल मीडियाशी जोडलेला आहे.आगामी काळात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी इच्छुक उमेदवारांनी ही सोशल मीडियाचा वापर करून आपापल्या प्रभागात प्रचारात आघाडी घेतली आहे. बहुतेक गावामधील तरूण पिढीकडे मोबाइल आहेत. सोशल मीडियाचे महत्व तरूण पिढी जाणते. त्यामुळे निवडणुकीतील इच्छुक उमेदवारांचा सोशल मीडियावर प्रचार काही महिन्यांपासून जोरात सुरू आहे. ही निवडणूक कधी होईल हे अद्याप निश्चित नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही निवडणूक ३१ जानेवारीपूर्वी होऊ शकते किंवा पुढेही जाऊ शकते. परंतु अचानक निवडणूक जाहीर झाली तर इच्छुक उमेदवारांच्या तुलनेत आपण प्रचारात मागे पडायला नको. त्यामुळे इच्छुकांनी सोशल मीडियामध्ये प्रचारात आघाडी घेतली आहे.वयस्कर उमेदवारांना मोबाइलचा वापर करता येत नाही, त्यातील काहींनी मुलांना, काहींनी कार्यकर्त्यांना आपल्या स्वतःच्या नावाचे फेसबुक, व्हॉटस ॲप अकाउंट चालविण्यास सांगितले आहे. काही उमेदवारांनी पैसे देऊन बाहेरील माणसांना हे काम सोपवले आहे. मात्र, या प्रकारातून बऱ्याच गमतीजमती घडत आहेत. उमेदवारांनी सोशल मीडियामध्ये टाकलेल्या फोटोमुळे व विविध वाचनीय वाक्यांमुळे मतदारांची मात्र चांगलीच करमणूक होत आहे. गुलाबी थंडीत राजकारण गरम गेल्या आठवड्यापासून वातावरणातील थंडी अचानक मोठ्या प्रमाणात वाढल्याने ग्रामीण भागात जागोजागी शेकोट्या पेटत आहेत. या शेकोटीजवळ घरातील आबालवृद्धांसह लहान मुले तसेच शेजारील मित्रमंडळीही जमू लागल्याने गप्पांचे फड रंगू लागले आहेत. गप्पांच्या फडात कोण किती मताधिक्याने निवडून येणार, कोण कुठे आघाडीवर, कोण कुठे पिछाडीवर आहे. याच विषयावर प्रामुख्याने चर्चा होत आहे. शेकोटीसाठी लागणारा लाकूडफाटा ग्रामीण भागात मुबलक प्रमाणात उपलब्ध होत असल्याने शेकोट्यांचा अग्नी धगधगत असतो. सध्या जिल्ह्याच्या ग्रामीण भागात गुलाबी थंडीचा कडाका वाढला असून, यात निवडणुकीच्या राजकीय गप्पा रंगत आहेत.