शिवसेनेची सावध भूमिका : भिंतीवर “यूटी वाईट’ असा उल्लेख
मुंबई :“वर्षा’ बंगल्यातील भिंतीवर लिहिलेल्या वाक्यांवरुन आता राजकारणाला सुरुवात झाली आहे. वर्षा बंगल्याच्या आतील भिंतींवर “भाजप रॉक्स, देवेंद्र फडणवीस रॉक्स’ असे शब्द लिहिलेले दिसत आहेत. या भिंतींवर लिहिलेल्या मजकुराचा व्हिडीओही समोर आला आहे.
भिंतींवरील काही वाक्यांमध्ये यूटी वाईट आहेत (UT is mean), असा उल्लेख करण्यात आला आहे. यूटी म्हणजे नेमकं काय अशा चर्चांना त्यामुळे सुरुवात झाली आहे. दरम्यान, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशी कुठलीही वाक्य बंगल्यातील भिंतींवर लिहिली नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. जेव्हा बंगला सोडला तेव्हा भिंतीवर काहीच लिहिलेले नव्हते, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
अत्यंत गलिच्छ आणि खालच्या पातळीचं हे राजकारण आहे. आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरु असल्याची टीकाही त्यांनी केली आहे. सध्या सुरु असलेल्या चर्चा ऐकून आश्चर्य वाटले. वर्षा बंगला सोडून जवळपास महिना उलटला आहे. बंगला सोडताना सर्व नीट तपालसे होते. वर्षा बंगला सोडल्यानंतर पुन्हा एकदाही तेथे आम्ही गेलेलो नाही.
वर्षातील भिंतींवर काहीही लिखाण दिविजा (मुलगी) किंवा कुणी केलेले नाही, अशी प्रतिक्रिया अमृता फडणवीस यांनी दिली आहे. या संपूर्ण प्रकरणावर शिवसेनेने मात्र सावध प्रतिक्रिया दिली आहे. लोकांना सगळं समजते, अशी प्रतिक्रिया शिवसेनेच्या उपनेत्या प्रियंका चतुर्वेदी यांनी दिली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिल्यानंतर भिंतींवर अशी वाक्य कुणी आणि का लिहिली, हा प्रश्न आता निर्माण झाला आहे.
सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
वर्षा बंगल्यातील व्हिडीओ कुणी शूट केला आणि तो बाहेर कसा आला याची माहिती अद्याप समोर आलेला नाही. मात्र व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओवरुन आता राजकारण सुरु झाले आहे. दिविजाच्या रुममधील हा व्हिडीओ आहे, असे बोलले जात आहे. या व्हिडीओबाबत अद्याप काहीही स्पष्ट झालेले नाही. मात्र यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.
लिहिणाऱ्यांचे तोंड काळ झाले
यावर प्रतिक्रिया देताना शिवसेना नेते संजय राऊत यांनी निषेध व्यक्त केला. वर्षाच्या भिंतीवर नेमंक काय लिहिले हे माहित नाही. असे मजकूर रंग मारुन मिटवता येतात. पण लिहिणाऱ्यांचे मात्र तोंड काळ झाले आहे, अशी प्रतिक्रया संजय राऊत यांनी दिली.
यावर कॉंग्रेस नेते अशोक चव्हाण यांनीही आक्षेप घेतला. अशा प्रकारचे व्यक्तिगत लिखाण शासकीय निवासस्थानाच्या भिंतीवर करणे योग्य नाही, असे ते म्हणाले. तसेच कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही टीका करत कुणाच्यातरी मनातील द्वेष यातून बाहेर आल्याचे वक्तव्य केले.