सोशल डिस्टन्सिंगचा उडला आंदोलनांवेळी पुरता फज्जा
पुणे – हाथरसपासून ते मंदिरे खुली करा…, अशा सर्वच विषयांवर शहरात विविध ठिकाणी सगळ्याचे राजकीय पक्षांकडून आंदोलने केली जात असताना करोना नियमांतर्गत सुरक्षिततेचे नियम नेतेमंडळींनी राजकीय खुंटीला अडकवून ठेवले होते. सर्वच ठिकाणी सुरक्षेच्या नियमांची “ऐशी तैशी’ करण्यात आल्याचे पाहायला मिळाले. “सामाजिक अंतर म्हणजे काय रे भाऊ’, असे विचारण्याचीच वेळ ही आंदोलने पाहिल्यावर आली आहे.
सर्वसामान्य माणूस रस्त्यावरून जाताना, वाहन चालवताना त्याला मास्कविषयी विचारणा करण्यात येते. एखाद्या दुकानाबाहेर ग्राहकांची रांग सुरक्षित अंतर ठेवून उभी न केल्यास संबंधित दुकानदारांना दंड लावण्यात येतो, असे असताना हाच “न्याय’ राजकीय पक्षांच्या आंदोलकांना का नाही? अगदी खेटून उभे राहून, हातात फ्लेक्स धरून, रस्त्यावर अगदी एकमेकांना चिकटून ही आंदोलन सुरू आहेत. मात्र, पोलीस आणि महापालिका प्रशासन उघड्या डोळ्याने हे पाहात आहे. अशावेळी सामान्य नागरिकाला एक न्याय आणि राजकीय पक्षांना दुसरा असे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
करोनाचा धोका अद्याप टळलेला नाही. सुरक्षित नियमांबाबत महापालिकेने अध्यादेशावर अध्यादेश काढले आहेत. सोशल डिस्टन्सिंग विषयी अनेकदा चर्वितचर्वण झाले आहे. अनेक कडक धोरणे अवलंबली आहेत. सणासुदीच्या काळातही महापालिकेने अनेक नियमांचे आदेश काढले आहेत. मात्र, याचे भान राजकीय पक्षांनी ठेवलेले दिसत नाही. केवळ महापालिका मुख्यसभेत एकत्र जमायचे नाही, याचे पालन मात्र तंतोतंत केले जाते आणि रस्त्यावर उतरून मोठ्या संख्येने आंदोलन केले जाते, हा विरोधाभास का? अशी विचारणाही नागरिकांकडून केली जात आहे.
पोलिसांच्या कार्यवाहीकडे पुणेकरांचे लक्ष…
काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी बारामतीमध्ये आंदोलन केले. यावेळी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. शहरात काही संघटनांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता, गेल्या दोन दिवसांत सर्वच राजकीय पक्ष रस्त्यावर उतरले होते, त्यांच्याकडून नियम मोडीत निघाले आहेत. मग, पोलीस कोण-कोणत्या पक्षावर गुन्हे दाखल करणार? याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे.
आंदोलनाच्या वेळी कायदा- सुव्यवस्था कायम राहावी याकडे पोलिसांचे अधिक लक्ष असते. राजकीय पक्षांनी आंदोलन करत असताना सामाजिक अंतर पाळणे आवश्यक आहे. आंदोलनाच्या दरमान्य कोणी मास्क वापरले नाही तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.
– अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त